विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शासनशास्त्र, ग्रीक रोमन (ख्रिस्त पूर्व ५०० ते इ.स. ५००) - पाश्चात्यांच्या शासनशास्त्राला प्राचीन ग्रीकांपासून सुरुवात होते. होमर व सोलन यांच्या ग्रंथांत या शास्त्राबद्दलचे विचार कांहीं ठिकाणीं आहेत, आणि थुसीडाईड्स, सॉव्रेच्टीस व सोफिस्टपंथी लेखक यांनीं या शास्त्राबद्दलचा उहापोह कांहीं अंशीं केला आहे. तथापि निरनिराळया राष्ट्रांनीं अगर संस्थानांची शासनपद्धत प्रत्यक्ष अवलोकून व तद्विषयक नियम गोळा करून त्यांच्या अनुभवाच्या साहाय्यानें पद्धतशीर अभ्यास करून शासनशास्त्रविषयक तत्वें लिहिणारा ग्रंथकार ऑरिस्टॉलच्या पूर्वी झाला नाहीं. साव्रेच्टिस आणि प्लेटो यांनीं राजकारणावर विचार व्यक्त केले आहेत. 'साव्रेच्टीसचे संवाद' या लेखसंग्रहांपैकीं 'दि स्टेट्स्मन', ' दि रिपब्लिक' व ' दि लॉज' हे तीन ग्रंथ प्लेटोचेच विचार प्रदषर्शत करतात. त्यांवरून साव्रेच्टिसाच्या विचारांची बरीच कल्पना येते. साव्रेच्टीसचा मुख्य उद्देश सद्वर्तनाचें महत्व, अस्तित्वांत असलेल्या कायद्यास मान देणें, इत्यादि गोष्टी तरुणांच्या मनावर बिंबविण्याचा असे. या संवादांपैकीं 'रिपब्लिक' मध्यें तात्विक वादविवादस बरीच जागा दिली असली तरी प्लेटोनें आपल्या कल्पना बर्याच स्वैर सोडल्या आहेत. त्याचा आरिस्टॉलनें चांगलाच समाचार घेता आहे. प्लेटोच्या 'रिपब्लिक' व इतर ग्रंथांतील विषय व आरिस्टॉटलच्या 'पॉलिटिक्स' मधील विषय बरेचसे वरवर सदृश दिसले तरी ते मूलतः भिन्न आहेत. प्लेटोचा उद्देश भूतलावर स्वर्ग निर्माण कसा करावा याविषयीं विवेचन करण्याचा होता. समाजांत पदार्थांचें उत्पादन करणारांचा, त्यांचें संरक्षण करणारांचा, व मंत्री व मॅजिस्ट्रेट यांचा असे तीन वर्ग असतात ही प्लेटोची कल्पना अलीकडील श्रमविभागाचें तत्व सूचित करते. या तीन वर्गांनीं सहकारितेनें वागणें हें उत्कृष्ट राज्य पद्धतीचें ध्येय होय. त्याकरितां खाजगी मालकीचें तत्व नाहींसें करुन समाजसत्ता (काम्युनिझम) हें तत्व अमलांत आणलें पाहिजे, तें इतकें कीं, प्रत्यक्ष मुलांवर सुद्धां आईबापांच्या ऐवजीं सरकारची मालकी पाहिजे, स्त्रीपुरुषसंबंध मॅजिस्ट्रेटच्या नियंत्रणाखालीं पाहिजे वगैरे मतें'रिपब्लिक' मध्यें आहेत. तसेंच आरिस्टॉक्रसी, टिमॉक्रसी, ऑलिगर्की, डेमॉक्रसी व टिरनी हे शासनपद्धतींचे नमुनेहि या ग्रंथांत वषर्णले आहेत. आरिस्टॉटलचा उद्देश प्रत्यक्षावलोकनानें निरनिराळया प्रकारच्या शासनपद्धतींचे गुणदोष दाखविणें आणि त्या अनुभवाच्या साहाय्यावर भावी कलाकरितां एखाद्या मुत्सद्दयाप्रमामें सूचना करणें असा होता. आरिस्टॉटलनें केलेलें अवलोकन राज्याच्या प्रकारांवरून होतें व त्यांच्या गुणधर्माचें अवलोकन आजतागाईत महत्वाचें समजलें जातें; व शासन शास्त्राच्या अभ्यासकास केवळ जुन्या कल्पनांची माहिती होण्याकरितां म्हणूनच नव्हे तर चिरकाल टिकणार्या सत्याकरितां ऑरिस्टॉटलचें ग्रंथ मननीय आहेत. अरिस्टॉटलनें या विषयाला शास्त्रीय स्वरूप देण्यांत प्लेटोच्या पुढें एक पाऊल टाकून प्रथम नीतिशास्त्र व शासनशास्त्र हीं एकमेकांपासून पृथ केलीं. त्याच्या 'दि पॉलिटिक्स' या ग्रंथांत आरिस्टॉटल म्हणतो, अनेक कुटुंबें व गांवें यांच्या समुच्ययानें राज्य ही संस्था निर्माण होते; आणि कुटुंबांतल्या कर्त्याप्रमाणें राज्याच्या सरकारची आज्ञाहि सर्वांनीं मानली पाहिजे. तसेंच राज्यकारभाराचा सर्व अधिकार मोठया बुद्धिमान व लायक इसांच्या हातीं राहून बाकीच्यांनीं फक्त त्यांचें हुकूम पाळण्याचें काम करावें. बुद्धिमान लोक हे मालक व बाकीचे लोक त्यांचे गुलाम होत. याप्रमाणें गुलामगिरीच्या संस्थेंचें त्यानें समर्थन केलें आहे. प्लेटोच्या समाजसत्तावादावर आरिस्टॉटलनें फार टीका केली आहे. उत्पादक उर्फ मजूर वर्ग राज्याला आवश्यक असला तरी हा हीन बुद्धीचा वर्ग गुलामाप्रमाणें राबण्यासच योग्य होय, शासनसत्ता हातीं घेण्यास लायक नाहीं, असें तो म्हणे. आरिस्टॉटलच्या कल्पनांमध्यें ज्या कल्पना आज आपणास विलक्षण वाटतात अशा कल्पना येणेंप्रमाणें (१) संस्थान लहानसेंच असावें, फार मोठें नसावें. (२) व्याज घेणें हें निंद्य आहे. (३) गुलामगिरी ही स्वाभाविक संस्था आहे. (४) राष्ट्रामध्यें लोकसंख्या फार होऊं नये यासाठीं प्रौढविवाह, गर्भधारण प्रतिबंध, अपत्यहनन वगैरे उपाय केले पाहिजेत. आरिस्टॉटलनंतर बर्याच काळपर्यंत यूरोपांत शासनशास्त्रविषयक चांगलेसें वाङ्मय झालेंच नाहीं. रोमन लोकांची शासनविषयक बुद्धिमत्ता ज्या मार्गानें गेली तो मार्ग म्हटला म्हणजे शासनशास्त्र नसून धर्मशास्त्र उर्फ कायदेशास्त्र होय. रोमन लोकांची बुद्धि ग्रीक लोकांप्रमाणें तात्विक विचार करणारी नसून व्यावहारिक स्वरूपाची होती आणि ग्रीक लोकांपासून निघालेली गुंतागुंतींचीं तत्वज्ञानें पाहून रोमन लोक भेदरुनहि जात असत पोलीबियस व सिसरो हे दोन या विषयावरील मुख्य लेखन होत. पण त्यांनीं फारशी नवीन भर घातली नाहीं.
मध्ययुग (इसवी सन ५०० ते १५००)- शासनविषयक कल्पनांमध्यें फेरबदल होण्याचा समय जेव्हां रोमनसाम्राज्य दुर्बल होत चाललें, ख्रिस्ती संप्रदायांतर्गत शासनसंस्था राजकीय स्वरुप धारण करूं लागली तेव्हां आला व या दोन अधिकारांमध्यें अधिक अधिकार कोणाचा यासंबंधानें वाद उपस्थित होऊं लागले. रोमन साम्राज्यांत ख्रिस्ती संप्रदाय राजमान्य झाला आणि रोमन पातशहा लोकांचें अद्यात्मिक हित अधिक पाहूं लागले आणि त्यावेळेस त्यांनीं निरनिराळया भागांकरितां बिशप नेमून तेथील लोकांमध्यें ख्रिस्ती संप्रदाय पसरविला आणि त्यांच्या उपासना व संस्कार यांची काळजी हे बिशप घेऊं लागले. त्यावेळेस चोहोंकडच्या लोकांचें अध्यात्मिक कल्याण कसें काय चाललें आहे याचा अहवाल प्रत्येक ठिकाणच्या बिशपाकडून बादशहाकडे प्रत्यक्ष न जातां रोमच्या बिशपमार्फत जाऊं लागला. त्याचा परिणाम असा झाला कीं, रोमच्या बिशपची सत्ता निरनिराळया ठिकाणच्या बिशपांवर बळावली, आणि पुढें जेव्हां साम्राज्यांत बखेडे माजले व खुद्द रोम शहरहि सम्राटाकडून सोडलें गेलें तेव्हां रोमच्या धर्मपीठास अधिक महत्व आलें आणि रोम हें केवळ पारमर्थिक काळजी वाहणारी संस्था नसून सर्वाधिकार असलेलें संस्थान बनलें. अशीं राजलक्षणें रोमच्या बिशपला म्हणजे पोपला आल्यापासून त्याच्या महत्वाकांक्षा वाढून सर्व राजे लोकांनीं व संस्थानांनीं पोपचें ऐकत जावें ही परिस्थिति उत्पन्न होण्याचा समय आला. निरनिराळया ठिकाणचे राजे रोमन पीठाच्या सत्तेस प्रतिकार करुं पहात. ख्रिस्ती सांप्रदायाची मान्यता रोमन बादशहाकडून झाल्यापासून वरील प्रकारच्या लढयांत यूरोपचीं सुमारें १००० वर्षें गेलीं, आणि त्याकालांत राज्य व पारमर्थिक पीठ यांपैकीं प्रत्येकाची वकिली करणारे अनेक लेखक निर्माण झाले. या कालामध्यें थॉमस ऍक्विन्स यानें अर्धवट लिहिलेल्या व ल्यूकच्या टॉलेमीनें पुर्या केलेल्या 'ऑफ दि गव्हर्नमेंट ऑफ प्रिन्सेस' या ग्रंथांत चर्चची स्वतंत्र सत्ता असली पाहिजे असें प्रतिपादिलें आहे. उलटपक्षी डान्टे यानें 'डी मॉनर्कीया' या पुस्तकांत 'राज्याची स्वतंत्र सत्ता' असली पाहिजे असें प्रतिपादिलें. राजे व पोप, तसेंच राजे व सरदार यांच्यामधील या शासनविषयक झगडयामुळें हळू हळू 'नियंत्रित राजसत्ताकपद्धती' (लिमिटेट मानकी) चा उदय झाला. तथापि आरिस्टॉठलनंतर यूरोपांतील शासनशास्त्रावर लिहिणारा मोठा प्रसिद्ध लेखक मॅकेआव्हेली हाच होय. मध्ययुग व अर्वाचीन कालच्या संधिकालांत होऊन गेलेल्या मॅकिआव्हेलीचे विचार मुख्यत्वें 'प्रिन्स' नांवाच्या त्याच्या एका लहानशा पुस्तकांत आढळतात. त्यांत विशेषेंकरुन राज्य कसें चालवावें याची कुटिलनीति वर्णली आहे. 'अनियंत्रित राजसत्तेचें (अनलिमिटेड मॉनर्की) समर्थन करुन प्रजेला आपल्या हुकुमांत ठेवण्याकरितां राजानें काय काय युक्त्या योजाव्या तें त्यानें सांगितलें आहे. त्याचें पुस्तक वाचतांना वारंवार भारतीय आर्य चाणक्याची आठवण होते. चाणक्याची व मॅकिआव्हेलीची बरोबरी होती असें मात्र नाहीं. चाणक्य ज्याप्रमाणें विविधविषयवेत्ता आणि राज्याच्या निरनिराळया खात्यांची सूक्ष्म माहिती असलेला, अनेक ग्रंथांचें पर्यालोचन करणारा दांडगा पुरुष भासतो तसा मॅकिआव्हेली हा भासत नाहीं. चाणक्याचें अर्थशास्त्र हें एका मोठया साम्राज्याच्या शासनाची जबाबदारी असलेल्या पुरुषानें लिहिलें आहे. आणि मॅकिआव्हेलीचें पुस्तक केवळ एखाद्या फाटक्या संस्थानिकास लटपटींत प्रवीण झालेल्या एखाद्या म्हातार्याचा उपदेश या स्वरुपाचें आहे. दोहोंमध्यें साम्य एवढेंच कीं, राजकारणाकरितां कोणते उपाय वापरावे यासंबधानें दोघांचीहि बुद्धि बेफिकीर होती.
अर्वाचीन काळ- शासनशास्त्रविषयक अभ्यासास नवीन दिशा सोळाव्या शतकांत लागली. ख्रिस्तीधर्मसुधारणे (रेफर्मेशन) च्या आरंभीच्या लूथर, झ्विंगली, केल्विहन वगैरे लेखकांची मतें मॅकिआव्हेलहून निराळीं होतीं. व्यक्तीचे हक्क व जबाबदार्या यांजवर वरील मंडळंनीं भर दिला. नैसर्गिक स्थिति (स्टेट ऑफ नेचर), सामाजिक करार (सोशलकॉट्रॅक्ट) व त्यावर उभारलेली राजकीय सत्ता किंवा सरकार (गव्हर्नमेंट) वगैरे कल्पना या वेळेपासून उद्भवून त्या १८ व्या शतकांत विशेष बळावल्या. पण आरिस्टॉटलप्रमाणें प्रत्यक्ष स्थितीच्या अवलोकनानें लिहिणारा विद्वान जीन बोडिन हा होय. त्यानें आपल्या'ऑफ दि कॉमनपवेल्थ' या पुस्तकांत राजसत्ता (सोंव्हरिन्टी) म्हणजे काय याची योग्य कल्पना पुढें मांडली व सरकार अन्याय करुं शकत नाहीं (दी स्टेच कॅन डू नो राँगः हें तत्व स्प,्ट सांगितलें. इटलींत आणि नंतर जर्मनींत स्टँटि स्टिक्स म्हणजे संस्थानविषयक शास्त्र निर्माण झालें. या शास्त्राचा उद्देश सर्व राष्ट्रांची संगतवार माहिती गोळा करुन देणें हा होता. परंतु याबरोबरच दुसरें एक शास्त्र जर्मनींत तयार झालें; तें शास्त्र म्हणजे 'कामेराल-विझेनशाफ्ट' हें होय. कामेरा म्हणजे कोठी. ज्या खोलीमध्यें बसून मुत्सद्दी अगर कारभारी आपला कारभार पाहतो त्यास 'कामेरा' म्हणतात. या मुत्सद्दयाच्या शास्त्रावर अनेक ग्रंथकार झाले. त्या ग्रंथकारांच्या ग्रंथांचा उद्देश राज्याला पैसा उत्पन्न करुन कसा द्यावा, राजाच्या इस्टेटीची व्यवस्था कशी लावावी, संस्थानचें व राजाचें खासगी उत्पन्न कसें वाढवावें, इत्यादि गोष्टींसंबंधानें विचार व्यक्त करणें हा होता. शासनशास्त्रामध्यें याच सुमारास तिसरी आणखी एक शाखा उत्पन्न झाली आणि ती शाखा म्हणजे सर्वराष्ट्रीय कायदेशास्त्र (इंटरनॅशनल लॉ) होय. ग्रूट नांवाच्या डच ग्रंथाकारनें ग्रोशियसचें लॅटिन नांव धारण करुन 'शांतता व युद्ध यावेळचें कायदेशास्त्र' या विषयावर एक ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ आणि पूर्वीचे रोमन कायद्यांतील नियम मिळून व निरनिराळे राजे लोकांचे आपापसांतील ठराव मिळून हे सार्वराष्ट्रीय कायदेशास्त्र उत्पन्न झाले. हें या वेळेसच उत्पन्न होण्याचें कारण हें कीं, खिस्तीसंप्रदायविषयक भावना दुर्बल होऊन संस्थान उर्फ राष्ट्रविषयक भावना जागृत झाली होती आणि पुष्कळ राष्ट्रांनीं आपलें पृथक्त्व आणि स्वातंत्र्य रोमविरुद्ध प्रस्थापित केलें होतें. हीं रोमला न मानणारीं राष्ट्रें आपणांस प्रॉटेस्टंट म्हणवीत. या कालापूर्वी हें सार्वराष्ट्रीय कायदेशास्त्र उदयास येण्याची आवश्यकताच नव्हती. कारण राजे लोकांत तंटे उपस्थित झाले आणि ते लढाई केल्याशिवाय मिटवावयाचे असले म्हणजे हे तंटे रोमकडे जात व रोमचें धर्मपीठ त्यावर निकाल देई। म्हणजे आज सार्वराष्टरीय कायदेशास्त्रानें जी कामगिरी होते ती कामगिरी कॅथोलिक कायद्यानें होत असे आणि जेव्हां रोमचा अधिकार अमान्य झाला, तेव्हां हें सार्वराष्ट्रीय धर्मशास्त्र आहे काय याविषयीं ग्रंथकार निर्माण होण्यास अवकाश मिळाला शासनशास्त्रविषयक जो विचार यूरोपांत झाला त्यांतदील आणखीं दोन अंगें म्हटलीं म्हणजे संस्थानच्या आंतच होत असलेल्या क्रियांचें पृथक्करण आणि संस्थानचें प्रजेविषयीं कर्तव्य काय आहे याविषयीं विचार. तिसराहि एक विचार उत्पन्न झाला तो राजदंडाची उत्पत्तीच कशी काय झाली यावर इतिहास बाजूला ठेवून, अवलोकन बाजूला ठेवून, केवळ मानसिक प्रवृत्तीच्या ज्ञानावर आणि कल्पनाशक्तीच्या साहाय्यानें झालेला विचार होय. या विषयावरील ग्रंथकार म्हणजे माँटेस्कु, बेन्थाम, आणि हॉब्स हे होत. राजा आणि पोप यांमधील भांडण मिटलें म्हणजे प्रजा आणि राजा किंवा सरदारांचा वर्ग आणि राजा यांमध्यें भांडण उप्सथित होणें अगदीं स्वाभाविकच आहे. परंतु सरदार आणि राजे यामधील भांडण सरदारांचा पूर्ण मोड होऊन केव्हांच मिटलें होतें. फ्रान्समध्यें रिशेलूनें सरदारांच्या नांग्या मोडल्या आणि इंग्लंडमध्यें 'वॉर्स ऑफ रोझेस' नांवानें प्रसिद्ध सलेल्या यादवींत सरदारांचा, त्यांच्या बालाचा व संपत्तीचा निःपात होऊन राजा बलिष्ठ बनला होता. अर्थात अधिकाराबद्दल तंटा जो व्हावयाचा तो राजा आणि प्रजा यांमध्येंच. इंग्लंडमध्यें राजाची आणि प्रजेची वकिली ज्या ग्रंथाकारानीं केली त्यांत फिल्मर आणि लॉक हे प्रसिद्ध आहेत.
यूरोपांतील शासनशास्त्रावर प्राचीन रोमन कायदे व ख्रिस्ती धर्माचे कायदे यांचा परिणाम झाला. रोमन कायदेशास्त्र यूरोपांतील बहुतेक राष्ट्रांत पसरलें याचें मुख्य कारण म्हटलें म्हणजे रोमचें यूरोपवर असलेलें स्वामित्व होय. यूरोपमध्यें तेथील कायद्यांवर आणि शासनविषयक कल्पनांवर परिणाम घडविणारी रोमन कायद्याखेरीज दुसरी संस्था म्हटली म्हणजे ख्रिस्ती संप्रदाय होय. पश्चिमेकडील यूरोप रोमन सत्तेखालीं आला आणि त्याबरोबर तो ख्रिस्ती संप्रदायाचा अंश बनला. त्यामुळें ख्रिस्ती संघाचीं आदितत्वें हीं सर्वराष्ट्रांच्या कायदेसंग्रहाचीं आधितत्वें बनलीं. राजाचे अधिकार कोणते व प्रजेचे अधिकार कोणते हें ठरविण्यासाठीं लेखक ज्याप्रमाणें रोमन कायद्यांकडे धांव घेत त्याप्रमाणें ख्रिस्ती ग्रंथांकडेहि धांव घेत. राजा हा ईश्वराचा अंश आहे हें तत्वज्याप्रमाणें भारतीय धर्मशास्त्रग्रंथांत सांपडतें त्याप्रमाणें राजास धिकारपत्र ईश्वराकडून मिळालें आहे अशी समजूत इंग्लंडमध्यें प्रस्थापित होत होती. आणि त्या समजुतीच्या पुष्टयर्थ ग्रंथकार बायबलाचा आधार घेत. फिल्मर हा बायबलाच्याच आधारावर राजाचे सर्वाधिकार स्थापित करूं पाही आणि लॉक हा लोकपक्षाकरितां जरी विरुद्ध बोले तरी तें तत्व अंशतः मान्य करी. लॉक व फिल्मर यांची तुलना करतां वादविवाद-कौशल्य आणि पांडित्य हीं लॉकमध्यें शासनशास्त्राच्या बाबतींत तरी बर्याच कमी प्रतीचीं दिसतात.
वरील 'ईश्वरी हक्क' (डिव्हाइन राईट) यासंबंधीं उपपत्तीविरुद्ध नैसर्गिक हक्क आणि सामाजिक करार या कल्पना हॉब्ज, लॉख व रुसो या तिघांनीं पुढें मांडल्या. हॉब्ज म्हणे कीं, निसर्गतः सर्व लोक स्वंतत्र व समान दर्जाचे असतात. पण आपापसांत सतत झगडा चालू नये म्हणून ते आपले हक्क राजसत्तेकडे देतात. मग राजसत्तेचे हुकूम ऐकणें एवढेंच त्यांचें काम उरतें व राजा पूर्ण सत्ताधारी होतो. लॉकचें म्हणणें थोडें निराळें आहे तें असें कीं, राजाला सामाजिक करारानें दिलेले हक्क पुन्हां परत काढून घेण्याचा हक्क प्रजेला असतो. या विचारसरणीनें त्यानें राज्यक्रांति करण्याच्या प्रजेच्या हक्काचें समर्थन केलें आहे. रुसो म्हणतो कीं, सामाजिक करारानें शासनसत्ता ही राजाला दिली जात नसून सर्व लोकांनां मिळून दिली जाते म्हणजेच लोकांनीं निवडून दिलेल्या प्रतिनिधींनां ती मिळते. वेळोंवेळीं हे प्रतिनिधी बदलण्याचा हक्क प्रजेला आहे. राजकीय विषयांवर जें तात्विक वाङ्मय होतें त्याचे दोन भाग करतां येतात एक तर कांहीं वाङ्मय तत्कालीन प्रश्न हातीं घेऊन त्यावरच विचार व्यक्त करतें आणि दुसरें केवळ संशोधन बुद्धीनें राजकीय व्यवहाराच्या पृथक्करणास व तद्विषयक ध्येयात्मक विचार करण्यास प्रवृत्त होतें. राजकीय व्यवहार ही गोष्ट अशी आहे कीं, त्याची छटा कोणत्याहि तत्ववेत्याच्या केवळ तटस्थ बुद्धीनें लिहिलेल्या लेखास देखील समकालीन परिस्थितीचा संपर्क घडविल्याशिवाय स्वस्थ रहात नाहीं. त्यामुळें यूरोपमध्यें जे बरेंचसें तात्विक वाङ्मय झालें तें सर्व तत्कालीन परिस्थितीशीं फार निकट संबंध असलेलें झालें. रुसोनें 'सोशल काँट्रॅक्ट' हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचा परिणाम फ्रान्स, इंग्लंड व अमेरिका यांवर विलक्षण झाला. नॅचरल राईट्स म्हणजे नैसर्गिक हक्क म्हणून कांहीं तरी असतात अशीहि कल्पना लोकांच्या डोक्यांत शिरली. ती हर्बर्ट स्पेन्सरपर्यंत चालूच होती असें दिसतें. व्यक्तीस संस्थानानें मदत करूं नये किंवा अडथळे आणूं नयेत म्हणून 'इंडिव्हिज्युऍलिझम' म्हणून जें मत स्पेन्सरनें फार जोरानें प्रतिपादिलें त्या मताचें समर्थन प्रथम 'ईश्वरी इच्छा' (डिव्हाईन वुइल) हिच्या साहाय्यानें केलें. पुढें हेच मत त्यानें नैसर्गिक हक्काच्या (नॅचरल राइटस्) साहाय्यानें स्थापित करण्याचा प्रयत्न केला. आणि पुढें स्पेन्सरचा जेव्हां ईश्वरी इच्छा आणि स्वाभाविक हक्क या दोन्ही कल्पनांवरील विश्वास उडाला तेव्हां त्यानें तेंच मत 'विकासवाद' (थिअरी ऑफ इव्होल्यूशन) याच्या साहाय्यानें सिद्ध केलें. 'सामाजिक करार' विषयक उपपत्ति खोडून काढण्याचें काम ह्यूम व ब्लॅकस्टोन यांनीं केलें आणि बेंथॅमनें आपली उपयुक्तता वादाची (युटिलिटेरिऍनिझम) उपपत्ति पुढें मांडली त्यानें नैसर्गिक हक्क व नैसर्गिक समाज आणि राजकीय हक्क व राजकीय समाज ह्या दोन कल्पना पृथ करुन राजकीय समाज उर्फ राज्यें आणि सरकार उर्फ राजसत्ता यांची व्याख्या केली. हुकूम पाळणें हें प्रजेचें कर्तव्य आहे; पण सरकारचे दोष दाखविणें व ते उपयुक्ततेच्या म्हणजे पुष्कळांचें पुष्कळ सुख साधणें या तत्वाच्या दृष्टीनें दाखविणें हा प्रजेचा हक्क आहे असें बेंथॅम म्हणतो. बँथॅमचा उपयुक्ततावाद मान्य करुन शासनशास्त्रावर लिहिणारे एकोणिसाव्या शतकांतले लेखक आस्टिन, सर हेनरी मेन, फ्रेडरिक हॅरिस आणि प्रो. हॉलंड हे होत.
जर्मनींत शासनशास्त्रावरील अलीकडील लेखक हेगेल, मार्क्स, लॅसेल वगैरे असून त्यांनीं समाजसत्तावादाचा (स्टेट सोशॅलिझ) पुरस्कार केला आहे. एकोणिसावें शतक संपल्यानतंर ज्या विचारानें सर्व राष्ट्रामध्यें प्रवेश केला तो विचार म्हटला म्हणजे 'साम्राज्यवाद' होय. प्रो. राइंच यांनीं आपल्या 'वर्ल्ड पॉलिटिक्स' च्या ग्रंथारंभीं म्हटलें आहे कीं, एकोणिसाव्या शतकांतून विसाव्या शतकांत प्रवेश म्हणजे राष्ट्रविषयक आकांक्षा व भावनांतून साम्राज्यविषयक आकांक्षा व भावनांत (इपीरिऍलिझम) प्रवेश होय. साम्राज्यवादाचे पोवाडे गाण्यांत मुत्सद्दी आणि तत्ववेत्ते आपलें वक्तृत्व खर्ची घालतात त्याप्रमाणें रुडियार्ड किपलिंगसारख्या कादंबरीकारानें आपलें गोष्टीलेखनकौशल्य आणि कवित्व खर्ची घातलें आहे. या इंपीरिऍलिझमचा अर्थ काय याविषयीं कल्पना मात्र स्पष्ट नाहींत. साम्राज्य कसें चालवावें आणि साम्राज्यांतील निरनिराळया भागांमध्यें परस्पराकर्षण कसें उत्पन्न करावें याविषयीं विचार फारसा नाहींच. इंग्लंडांतील सवंग तत्व ते यासंबंधानें असें प्रतिपादन करीत असतात कीं, कमी प्रगति झालेल्यालोकांस जिंकून आणि त्यांनां राबवून त्यांच्यावर चरावें हा उच्चलोकांचा हक्क आहे. उदाहरणार्थ बेंजामिन किड याचें 'एक्सप्लॉटेशन ऑफ ट्रॉपिक्स' हें पुस्तक पहा. जगावरील काळे अदमी यांची जमा कोठेंच करतां येत नाहीं अशा तर्हेचीं मतें व्यक्त करणारांस हिंदुस्थानचे कैवारी म्हणून समजले गेलेल डब्ल्यू.टी.स्टेड (माजी रिव्ह्यू ऑफ रिव्हूज चे संपादक) होते. त्यांनी 'अमेरिकनायझेशन ऑफ दि वर्ल्ड' या पुस्तकांत असें प्रतिपादन केलें आहे कीं, ब्रिटिश साम्राज्यामध्यें सारे आठ दहा कोटीच लोक आहेत. हिंदुस्थानचे लोक व आफ्रिकेंतील लोक यांची गणनाच करावयास नको; कारण जगाच्या प्रगतीशीं या काळया लोकांचा संबंध कांहीच नाहीं, साम्राज्यविषयक भावना लोकांत आहे याचा अर्थ एवढाच कीं, जगांतील कर्त्या लोकांनां आपला ताबा पुष्कळ लोकांवर देशांवर बसवावा अशी इच्छा आहे. साम्राज्याचें एकीकरण व दृढीकरण करावयाची इच्छा नाहीं आणि या इच्छेनें प्रेरित होऊन ब्रिटिश साम्राज्यासारख्या प्रसिद्ध साम्राज्याकडून एकहि नांव घेण्याजोगें कार्य झालें नाहीं.
राष्ट्र लोकशासित असो अगर राजशासित असो त्यामध्यें अलीकडे बरेंचसें डोकावूं पाहणारें तत्व म्हणजे तज्ज्ञ राज्य होय. राज्य तज्ज्ञांच्या हातीं असावें म्हणून आणि स्वतः तज्ज्ञ आहोंत असा बहाणा करून हिंदुस्थानांतील नोकरशाहीचे प्रतिनिधी आपल्याच हातीं अधिकार ठेवण्यासाठीं वकिली करीत आहेत. त्याचप्रमाणें इंग्लंडांत, जर्मनींत व अमेरिकेंत तज्ज्ञांस अधिकार असावे म्हणून युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरांकडून आक्रोश करण्यांत येतो. जर्मनींत बरेंचसें हें साध्य झालें होतें, आणि अमेरिकेंत हें साध्य होण्याच्या पंथास लागलें आहे. इंग्लंडांत हें साध्य व्हावयास बरीच अडचण पडेल; याचें कारण इंग्लंडांतील 'सिव्हिल सर्व्हिस' ची पद्धत हे होय. इंग्लंडमध्यें मनुष्य सिव्हिल सार्व्हिसमध्यें अल्पवयांत शिरतो आणि तो काम करीतच वाढत वाढत थोर पदापर्यंत जातो. आणि जबाबदारीच्या ज्या जागा आहेत त्या जागा पार्लमेंटांतील सभासदांपैकीं जे कॅबिनेटमध्यें शिरतात त्यांच्या हस्तगत होतात. आणि या पद्धतीनें ज्या लोकांनीं तज्ज्ञता मिळविण्यासाठीं अनेक दिवस परिश्रम केले आहेत अशा लोकांचा शिरकाव होणें कठिण जातें. अमेरिकेच्या खानेसुमारीचे रिपोर्ट कोणत्याहि देशाच्या रिपोर्टापेक्षां पुष्कळ उच्च दर्जाचे आहेत याचे हेंच कारण होय. अमेरिकेमध्यें सरकारचें नेहमींच्या कामाखेरीज बाहेरचें जें काम असेल तसलें काम आलें म्हणजे एक कमिशन नेमतात आणि तें कमिशन प्रत्यक्ष गव्हर्नरला किंवा प्रेसिडेंटला जबाबदार असतें. सरकारचीं नेहमींचीं खातीं न वाढवितां कमिशनें वाढविण्याचा प्रघात पुष्कळ ठिकाणीं सुरु आहे आणि तेथें तज्ज्ञाची नेमणूक करतां येतें. कधीं कधीं या सराकरी कमिशनमधून अत्यंत उपयुक्त शास्त्रीय ज्ञान बाहेर पडतें. उदारणार्थ अमेरिकेच्या इमिग्रेशन कमिशनचे मुख्य चालक प्रो. जेंक्स असतां दोन शोधांत उत्तेजन मिळालें. ते शोध म्हटलें म्हणजे शरीरविक्रयार्थ स्त्रियांचा व्यापार (व्हाइटस्लेव्ह ट्रॅफिक) आणि बाहेर देशांहून जे लोक अमेरिकेंत येतात त्यांच्या मुलांच्या शरीरांमध्यें फेरबदल कसे होत आहेत याचें मोजमाप. या मोजमापींत बाहेरुन येणार्या लोकांचीं मुलें आपल्या डोक्याचा पितृमुख अगर मातृमुख आकार सोडून त्यांची डोकीं सर्वसामान्य अमेरिकन डोक्यांच्यासारखीं होत आहेत हा शोध लागला आहे.
तज्ज्ञांचें साहाय्य लोकस्थितीचें किंवा अर्थशास्त्रीय विषयांचें संशोधन करण्याकडे अधिकाधिक घेतलें जाईल यांत संशय नाहीं. पण उपाय योजण्याच्या बाबतींत घेतले जाईल किंवा नाहीं यासंबंधानें बराच संशय आहे. स्वच्छता राखण्यासाठीं किंवा रोगाचा प्रसार बंद करण्यासठीं, किंवा शिक्षणविषयक योजना करण्यासाठीं तज्ज्ञांच्या शिफारशी घेतल्या जातील. परंतु ज्या अनेक गोष्टी पक्षविषयकद्वैतास कारण आहेत त्या बाबतींत तज्ज्ञांच्या उपदेशाचेंवजन कितपत पडेल यासंबंधानें बरीच शंका आहे. कांहीं बाबतींत तज्ज्ञांचें महत्व निरनिराळया राष्ट्रांमध्यें अमेरिकेनें स्थापन केलें आहे. जेव्हां ब्रिटिश ग्युआना वव्हेनिझुएला यांच्यामध्यें आपली खरी सीमा कोणती यासंबंधानें तंटा उपस्थित झाला आणि त्यावेळेस ऐतिहासक तर्हेनें शोध करुन ब्रिटन जर तडजोडीस तयार नसेल तर अमेरिका योग्य हद्द कोणची हें ठरवील आणि तीच सरहद्द कायम राखील असा अमेरिकन प्रेसिडेंटनें निश्चय व्यक्त केल्यानंतर इंग्लंड कमिशनच्या गोष्टीस कबूल होऊनजें कमिशन नेमलें गेलें त्यावेळेस ऐतिहासक तर्हेनें संशोधन करणयासाठीं संशोधन नेमले गेले होते. दानधर्म आणि समाजव्यंगनिवारण इत्यादि बाबतींत कायदे करण्यासाठीं किंवा लोकसुधारक संस्था चालविण्यासाठीं तज्ज्ञांचा उपयोग होतो. पण यांपेक्षां तज्ज्ञांचा उपयोग कितपतसा होईल याविषयीं मोठी शंका आहे. राजकीय विषयध्येयासंबंधानें ज्या लेखाचा गेल्या थोडया वर्षांत अत्यंत मोठा परिणाम झाला तो लेख म्हटला म्हणजे प्रेसिडेंट विल्सनचें पत्र होय. यामध्यें अनेक तत्वें गोंवलीं गेलीं आहेत. त्या तत्वांचा प्रसार अनेक लोकांवर फार जोरानें झाला (ज्ञानकोश विभाग पहिला 'हिंदुस्थान आणि जग' पृष्ठे ६३ ते ६६ पहा.)
भावी काळामध्यें यूरोपमध्यें जे विचारसमूह दुसर्याविरुद्ध विजयाकरितां स्पर्धा करीत राहतील त्यांचें वर्गीकरण दोन तर्हानीं करतां येईल. शासनसंस्थेविषयीं अभिमान मनांत धरुन राष्ट्र बलवान कसें करावें याविषयीं होणारा विचार, आणि राष्ट्राच्या अस्तित्वाचें समर्थन व्यक्तिसुख देण्याच्या त्याच्या शक्तीमुळें होतें आणि व्यक्तिसुख हें ध्येय असून राष्ट्रघटना हें केवळ साधन आहे यासाठीं व्यक्तीच्या सुखाच्या दृष्टीनें सार्वजनिक प्रश्न सोडवावेत असें म्हणणारा वर्ग. हे दोन वर्ग निरनिराळया तत्वज्ञानाची कांस धरतील आणि जर प्रेसिडेंट विल्सननें काढलेली राष्ट्रसंघाची कल्पना यशस्वी होऊन राष्ट्रसंघ अधिक बलवान झाला तर संस्थानमर्यादांचें महत्व कमी कमी होत जाईल. स्वयंनिर्णयाच्या तत्वाच्या साहाय्यानें म्हणजे या तत्वानें संस्थानांतील लोकांनीं आपणांस वाटेल त्या राष्टारचें अंशभाकू व्हावें यानें राष्ट्रांच्या जेष्णुतेवर गदा घातली आहे.
भारतीय- प्राचीन संस्कृत ग्रंथकारांच्या मतें राजकारण किंवा राजशासन हा अर्थशास्त्राचा एक महत्वाचा भाग असून त्याला 'नीतिशास्त्र' किंवा दंडनीती असें स्वतंत्र नांव असे. या दंडनीतीचें विवेचन व त्यावरील ग्रंथ 'अर्थशास्त्र' या लेखांत (ज्ञा.को.वि. ६ व ७) केलेंच आहे.
हिंदू राज्यांतून या दंडनीतीच्या तत्वाबरहुकूम राज्यकारभार चाले. या शास्त्राला विशेषसें नवीन स्वरुप किंवा अनुल्लंघ्य कायद्याचें स्वरूप प्राप्त झालेलें दिसत नाहीं. मराठीं साम्राज्यांतहि पौराणिक नीतिग्रंथांचा आधार विशेषतः घेत. रामचंद्रपंत बावडेकर अमात्य यांनीं एक राजनीति म्हणून सूत्ररुप ग्रंथ तयार केला होता. तसेंच मल्हार रामराव यांची राजनीति, नाना फडणविसानें तयार करविलेली नारायणव्यवहारशिक्षा, सवाईरावसाहेबांस माधवराववेदांती यानें उपदेश केलेली महाराष्ट्रधर्माची टिप्पणी, प्रतापसिंह छत्रपतीनें केलेले राज्यकारभारविषयक जाबते, इत्यादि प्रयत्नहि पूर्वीच्या हिंदु राजशासनग्रंथांनां धरूनच झालेले आहेत. राज्यकारभाराच्या सोईंसाठीं खातीं निरनिराळीं करणें, अष्टप्रधानसंस्था स्थापणें, अठरा कारखाने चालविणें, इत्यादि गोष्टी पूर्वापार चालत आल्या आहेत. ('अर्थशास्त्र' ज्ञा.को. ७ पृ. ४४७ पासून पुढें।)
हिंदुस्थानांत कांहीं काळ स्थापित झालेली मुसुलमानी राजसत्ता ही लष्करी बळावर स्थापल्यानें तिच्या राज्यकारभाराचा मुख्य पाया लष्करी धाटणीचाच होता (ज. सरकार मोंगल ऍडमिनिस्ट्रेशन). मुसुलमानी धर्मांत राजा हाच धर्माचा व राज्याचा मुख्य मानण्यांत येतो. त्यामुळें या तत्वास अनुसरून हिंदुस्थानांत त्यांचें शासनशास्त्र उदयास आलें. परंतु पुढें त्यांतहि इराणी व ईजिप्ती (पर्सो-ईजिप्शियन) भेसळ झाली (एन्साय. ऑफ इस्लाम). जमीनमहसुलाखेरीज बाकीच्या कामांत कुराणांत सांगितलेले नियम व त्याबरोबरच जगांतील इतर जुन्या मुसुलमानी राज्यांतील कायदे यांचें मिश्रण दिसून येतें (इलियट व डॉसन भा. ३). त्यांत जुलमी बादशहांच्या कारकीरर्दीत बरेचसे कायद्याचे नियम धाब्यावर बसविले जाते; जदुनाथ सरकारनें तर या मुसुलमानी राज्यांनां एके ठिकाणीं 'कागदी राज्य' म्हटलें आहे (मो.ऍ. १५). हनफी, मलकी, शफीई, व हनबली असे मुसुलमानी शासनशास्त्राचे चार मुख्य भेद असून पहिला प्रकार हिंदुस्थानांत विशेष चाले. औरंगजेबानें फतवा-ई-अलमगिरी म्हणून एक पुस्ती या कायद्यांनां जोडली होती. एकंदरींत हिंदुस्थानांत खास मुसुलमानी शासनशास्त्र असें संपूर्ण रीत्या प्रचारांत आलें नव्हतें, वर सांगितलेल्या त्यांच्या शास्त्रांनां स्थानिक हिंदुशास्त्राची (फ्कत धार्मिक बाबींखेरीज) जोड ध्यावी लागे. या विषयावर ऐन-ई-अकबरी, दस्तूर-उल-अम्ल अकबरनामा, बहादूर शाहनामा, मीरत-ई-अहमदी इ. पुस्तकें पहाण्यासारखीं आहेत.