विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुंबई, इलाखा.- हा हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्यावर उत्तरेस सिंधपासून दक्षिणेस कानडापर्यंत पसरला आहे. या इलाख्यांतील संस्थानें व एडन, यांच्यासुद्ध या इलाख्याचें क्षेत्रफळ १८७०७४ चौरस मैल आणि लोकसंख्या २६७५७६४८ आहें. यांपैकीं देशी संस्थानांचें क्षेत्रफळ ६३४५३ चौरस मैल, आणि लोकसंख्या ७४१२३४१ आहे. शिवाय या इलाख्यांतील बडोदें संस्थान हें पहिल्या दर्जाचें असून तें हिदुस्थानसरकारच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखालीं आहे. बडोदे संस्थानचें क्षेत्रफळ ८१८२ चौरस मैल व लो. सं. २०३२७९८. या इलाख्यांत जमीन, हवा आणि लोक फार विविध प्रकारचे आहेत. गुजराथप्रांताचा प्रदेश सपाट व फार सुपीक आणि नर्मदा व तापी या नद्यांच्या पाण्यानें भिजणारा असल्यामुळें त्याला 'हिंदुस्थानची बाग' हें नांव बर्याच पूर्वीपासून मिळालेलें आहे. या इलाख्यांतील मध्यभागाचे उर्फ महाराष्ट्राचे सह्याद्रि पर्वतामुळें कोंकण व देश असे दोन भाग पडले आहेत. सह्याद्रीच्या पायथ्यापासून समुद्रापर्यंतच्या प्रदेशाला कोंकण म्हणतात, व त्यांत मुख्यतः भाताचें उत्पन्न होतें. या भागांत खाडया अनेक आहेत. उत्तरेकडील सिंधप्रांत हा बहुतेक ओसाड वाळवंट असून सिंधुनदीकांठचा प्रदेश मात्र सुपीक आहे. या इलाख्यांतील लोकहि विविध प्रकारचे आहेत. सिंधप्रांतांत मुसुलमान संख्येनें अधिक आहेत. गुजराथेंतील लोक त्या प्रांतावर मुसुलमानी अंमल बराच काळ होता तरी पूर्ण हिंदुधर्मी राहिले आहेत. तथापि गुजराथी लोकांत जाती फार आहेत. शिवाय हे गुजराथी लोक जगांतील अत्यंत हुषार अशा व्यापारी जातीच्या लोकांत गणना करण्यास योग्य असे आहेत. महाराष्ट्रांत शेतकीवर्ग प्रमुख असून तो दारिद्य्रपीडित आहे. कारण या भागांत प्रत्येक तीन वर्षांनीं एकदां पुष्कळ पडावयाचा अशी म्हण आहे आणि त्याप्रमाणें वारंवार दुष्काळ पडतोहि. महाराष्ट्रांतील लोकसमाजांत गुजराथेपेक्षां जातिभेदाची विविधता कमी आहे, आणि लोकसंख्येपैकीं शेंकडा ३० मराठे आहेत. कर्नाटकांत लिंगायतांची लोकसंख्या विशेष आहे. लिंगायत हा हिंदूंचाच १२ व्या शतकांत उत्पन्न झालेला एक पंथ आहे. कोंकणामध्यें ख्रिस्ती लोकांची वस्ती बरीच आहे. या इलाख्यांत सिंधी, गुजराथी, मराठी व कानडी या चार मुख्य भाषा आहेत. या इलाख्यांत रानटी जातीसुद्धं एकंदर हिंदु लोकांच्या जातीं सुमारें पांचशें आहेत.
उद्योगधंदेः- शेतकी हा या इलाख्यांतील मुख्य धंदा असून शेंकडा ६४ लोक त्यावर उपजीविका करतात. सिंध प्रांतांत कालव्याच्या पाण्यावर होणारें गहूं आणि कापूस यांचे उत्पन्न दरसाल वाढत्या प्रमाणावर आहे. गुजराथेंत कांहीं भागांत उत्तम काळी जमीन असून तींत पिकणारा भडोची कापूस सर्व हिंदुस्थानांत उत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. अहमदाबाद व खेडां जिल्ह्यांत उत्तम मळईची जमीन असून तींत बागाइती पिकें होतात. महाराष्ट्रांतील देश या भागांतली जमीन काळी असून तींत कापूस, गहूं हरभरा, मका आणि कांहीं भागांत उत्तम ऊंस वगैरें पिकें होतात. कोंकणांत पाऊस पुष्कळ पडतो त्यामुळें तेथें भाताचें उत्पन्न चांगलें होतें. धारवाडांत कापूस पिकतो तो भडोची कापस्ज्ञच्या तोडीचा असतो. गेल्या वीस वर्षांत दुष्काळ व प्लेग यांनीं या इलाख्याचें नुकसान हिंदुस्थानांतील कोणत्याहि भागापेक्षां अधिक केलें आहे. महाराष्ट्रांतील लोक स्वावलंबनानें इतर उद्योगधंद्यांकडे अधिक वळूं लागले आहेत, व त्यांची रहाणी सुधारत आहे; हा दुष्काळिक आपत्तीमुळें एक फायदाच झाला आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. या इलाख्यांत बहुतेक ठिकाणीं जमीनधार्याची रयतवारी पद्धषत आहे.
शेतकी हा मुख्य धंदा असला तरी इतरहि महत्त्वाचे धंदे येथें सुरू आहेत. या इलाख्यांत खनिज द्रव्यांची प्राप्ति फारशी नाहीं. इमारती दगड, समुद्राच्या पाण्याचें मीठ आणि मँगेनीज हींच कायतीं खनिज द्रव्यें येथें सांपडतात. हातकामाचे धंदे मात्र सर्वत्र फार पसरलेले आहेत. मागावर विणणारे लोक चांगल्या रंगाचीं लुगडीं काढतात. अहमदाबाद व सुरत येथें उत्तम किनखाबी कापड तयार होतें. पण हल्ली त्याची निपज कमीकमी होत आहे. मुंबईस होणारें चांदीचें काम आणि पुणें व नाशिक येथें होणारें पितळेचें काम विशेष प्रसिद्ध आहे, तथपि या धंद्यांचें पूर्वीचें घरगुती स्वरूप नष्ट होऊन मोठाल्या कारखान्यांचें स्वरूप येत आहे. मुंबई इलाखा हा हिंदुस्थानांतील विणकामाचें फार मोठें केंद्र आहे, आणि विणकामाचें मुख्य आगर मुंबई शहर आहे.
मुंबई शहरांतील माग व सुताच्या चात्या अनुक्रमें ६८९४६ व ३३४९०८२; अहमदाबादमधील अनुक्रमें २८८३९ व १३४५४७४१ व सोलापुरांतील ४६८७ व २५७०९६ आहेत.
मुंबईमध्यें घाटावरील पाण्यापासून उत्पन्न झालेली विजेची शक्ति मिळण्याची सोय झाल्यामुळें उद्योगधंद्यांच्या वाढीला अधिक उत्तेजन मिळालें आहे व त्यामुळें १९१९ नंतर अनेक प्रकारच्या उद्योगधंद्यांच्या नव्या नव्या कंपन्या निघाल्या आहेत. हिंदुस्थाच्या पश्चिम किनार्यावरचें मुंबई शहर हिंदुस्थानांतील मुख्य मुख्य बाजारपेठांचा पाश्चात्त्य देशांतील बाजारपेठांशीं संबंध जोडण्यास फार सोयीचें असल्यामुळें या शहराचा समुद्रावरील व्यापार फार वाढला आहे. पश्चिम किनार्यावरील सुरत, भडोच, खंबायत व मांडवी हें बंदरें प्राचीन काळीं प्रसिद्ध होतीं व त्या बंदरांतून धाडसी नाविक लोक इराणचें आखात आणि आकिेचा किनारा यांच्यांशीं हिंदुस्थानचा व्यापार चालवीत असत. पण अलीकडे सुवेझचा कालवा तयार होऊन मोठमोठाल्या आगबोटींची रहदारी सुरू झाल्यापासून किनार्यानजीक खोल पाणी असणार्या मुंबई व कराची या दोन बंदरांमार्फत सर्व व्यापार चालतो. पोर्तुगीज मुलुखांतील मार्मागोवा हें मोठें व्यापारी बंदर बनविण्याचा प्रयत्न चालू आहे.
राज्यकारभारः- या इलाख्याचा कारभार गव्हर्नर हा चार एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलर आणि तीन दिवाण आणि प्रांतिक कायदेकौन्सिल यांच्या मदतीनें चालवितो. कायदेकौन्सिलांत ८६ लोकनियुक्त आणि २५ सरकारनियुत्तचंपैकीं २० अधिकारी आणि ५ बिनअधिकारी सभासद असतात. सरकारी खात्याचे राखीव (रिझर्व्हड) आणि सोंपीव (स्ट्रॅन्सफर्ड) असे दोन प्रकार केले आहेत. मुंबईसरकारचा सर्व कारभार सेक्रेटरीएट नांवाच्या कचेरीमार्फत चालतो. त्याचीं सात खातीं असून त्या प्रत्येक खात्याचा एकएक सेक्रेटरी आहे. ती खातीं (डिपार्टमेंटस्) (१) फायनान्स (फडणिशी), (२) रेव्हेन्यू (मुलकी), (३) होम (गृह), (४) पोलिटिकल (राजकीय), (५) जनरल (सर्वसाधारण), एज्युकॅशनल, मरीन व इक्लिझिएस्टिकल (शिक्षण, नाविक व धर्म), (६) लीगल (कायद्यासंबंधीं), (७) पब्लिक वर्क्स. मुंबईसरकारचें ठाणें नोव्हेंबर ते मार्च मुंबईस, एप्रिल ते जून महाबळेश्वरास, आणि जून ते नोव्हेंबर पुण्यास असतें, परंतु सेक्रेटरीएट नेहमीं मुंबईसच असतें. मुंबई इलाख्याचे चार भाग असून त्या प्रत्येकावर एकेक कमिशनर हा अधिकारी आहे. त्यांचीं मुख्य ठिकाणें कराची, अहमदाबाद, पुणें व बेळगांव हीं होत. प्रत्येक जिल्ह्याचा मुख्य अधिकारी कलेक्टर असून त्याच्या मदतीला असिस्टंट कलेक्टर व डेप्युटी कलेक्टर असतात. एका जिल्ह्यांत आठ ते दहा तालुके असतात, आणि प्रत्येक तालुक्यांत १०० पासून २०० गांवें असतात. प्रत्येक गांवांत पाटील, कुलकर्णी किंवा तलाठी व महार हे कामगार असतात. प्रत्येक तालुक्यावर मामलेदार हा मुख्य अधिकारी असून सबॉर्डिनेट मॅजिस्ट्रेटहि तोच असतो. असिस्टंट किंवा डेप्युटी कलेक्टर याच्या ताब्यांत तीन किंवा चार तालुके असतात. न्यायाच्या कामाकरितां मुंबईस हायकोर्ट असून त्यांत एक चीफ जस्टिस व सात दुय्यम जज्ज असतात. सिंधमध्यें हायकोर्टाच्या दर्जाचें जुडीशियल कमिशनरचें एक स्वतंत्र कोर्ट असून शेवटीचें फौजदारी व दिवाणी अपिलें तेथेंच चालतात. कांहीं मोठाल्या शहरीं स्पेशल मॅजिस्ट्रेट नेमलेलें असून त्यांनां संक्षिप्तरीतीनें चौकशी करण्याचे अधिकार दिलेले आहेत.
स्थानिक कारभारः- या कारभाराकरितां शहरांत व बहुतेक तालुक्यांत ठिकाणीं म्युनिसिपालिटया आहेत. सबंध तालुक्याचा व जिल्ह्याचा स्थानिक कारभार पाहाण्याकरितां तालुकालोकलबोर्डें व जिल्हालोकबोर्डें आहेत. या संस्थांत बहुतेक लोकनियुक्त सभासद आणि थोडे सरकारनियुक्त सभासद असून अध्यक्ष लोकनियुक्त असतो. या संस्थांचें काम शिक्षण, आरोग्य, दवाखानें, पाणीपुरवठा, सडका वगैरेंची व्यवस्था करण्याचें आहे. या संस्थांनां उत्पन्न लोकलफंड, व जकाती यांचें मिळतें. शिवाय सरकारांतूनहि पैशाची मदत होते.
पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट हें दोन चीफ इंजिनियरांच्या ताब्यांत आहे. त्यांच्या हाताखालीं सुपरिन्टेंडिंग इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे असतात. हल्ली कालवे खोदण्याचें मोठे काम सिंधप्रांतांत चालू आहे. मध्यभागांत म्हणजे महाराष्ट्रांत निरा नदीचा कालवा, मुठा नदीचा कालवा, गोदावरीचा कालवा आणि गोकाकचा कालवा हे मुख्य आहेत. यांशिवाय प्रवरा नदीचा कालवा आणि निरा राइट बँक कालवा यांचीं कामें चालू आहेत.
पोलिसखात्यामध्यें जिल्हापोलीस, रेल्वेपोलीस व बाँबे सिटीपोलीस असे तीन प्रकार आहेत. डिस्ट्रिक्ट पोलिसांवर इन्स्पेक्टर जनरल हा मुख्य अधिकारी असून त्याच्या हाताखालीं डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल आणि प्रत्येक जिल्ह्याचे पोलीस सुपरिंटेंडेंट, असिस्टंट सुपरिंटेंन्डेट, सबइन्स्पेक्टर, चीफ कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल असे अधिकारी असतात. मुंबई शहरपोलीसची व्यवस्था स्वतंत्र अधिकारी आहे.
शिक्षणः- या इलाख्यांत शिक्षण कांहीं सरकारी आणि कांही निमसरकारी संस्थामार्फत दिलें जातें. मुंबई, पुणें, अहमदाबाद व धारवाड येथें एक एक सरकारी आर्ट्स (वाङ्मयाचें) कॉलेज असून मुंबईस ग्रँट मेडिकल कॉलेज, व्हेटेरिनिरी कॉलेज स्कूल ऑफ आर्ट, लॉ स्कूल, कॉसर्स कॉलेज, रॉल इन्स्टिटयूट ऑफ सायन्स, सेकंडरी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज; पुणें येथें इंजिनियरिंग कॉलेज, या सरकारी शिक्षणसंस्था आहेत. याशिवाय मुंबईस सेंटझेवियर्स कॉलेज, विल्सन कॉलेज; पुण्यास फर्ग्यूसन कॉलेज, न्यू पूना कॉलेज; लॉ कॉलेज, कराचीस इंजीनियरिंग कॉलेज, व आर्ट्स कॉलेज; नाशिक येथें गोखले एज्युकेशन सोसायटीचें आर्ट्स कॉलेज; सांगलीस पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचें आर्ट्स कॉलेज व कोल्हापुरास आर्य समाजाचें एक आर्ट्स कॉलेज, या निमसरकारी संस्था आहेत. यांशिवाय मुंबईस व्हिक्टोरिया टेनिकल इन्स्टिटयूट, बाँबे बॅक्टेरियालॉजिकल लॅबोरेटरी; राजकोट येथें चीफ्स (संस्थानिकांचें) कॉलेज वगैरे संस्था आहेत. दुय्यम शिक्षणाच्या संस्था बहुतेक निमसरकारी आहेत आणि प्राथमिक शिक्षण लोकलबोर्डें आणि म्युनिसिपालिटया यांच्या ताब्यांत आहे. १९२२ सालीं मोफत व सत्तच्ीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा पास झाला असून तें शिक्षण अंमलांत आणण्याची व्यवस्था लोकलबोर्डें व म्युनिसिपालिटया यांच्याकडे आहे व त्याचा खर्च कांहीं सरकारनें व कांहीं सदरहू स्थानिक संस्थांनीं सोसावयाचा आहे.
याशिवाय या इलाख्यांत पूर्णपणें खाजगी अशा कांहीं उच्च शिक्षणसंस्था आहेत, त्या म्हणजे पुण्याच्या टिळक विद्यापीठानें चालविलेलें टिळक महाविद्यालय, हिंगणे येथील स्त्रियांची युनिव्हर्सिटी, व अहमदाबाद येथें गुजराथ विद्यापीठानें चालविलेलें राष्ट्रीय महाविद्यालय या होत.
मेडिकल खातें सर्जन-जनरल आणि आरोग्यखातें डायरेक्टर ऑफ पब्लिक हेल्थ या मुख्य अधिकार्यांच्या हातीं असून त्यांच्या हाताखालीं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणीं सिव्हिल सर्जन आणि असिस्टंट डिरेक्टर्स ऑफ पब्लिक हेल्थ हे अधिकारी असतात. मुंबई शहरांत सरकारनें चालविलेलीं तीन इस्पितळें आहेत, आणि शिवाय बहुतेक मोठल्या शहरीं इस्पितळें आहेत. याशिवाय या इलाख्यांत सहा वेडयांचीं इस्पितळें आहेत. याशिवाय या इलाख्यांत सहा वेडयांचीं इस्पितळें व १६ महारोग्यांकरितां संस्था आहेत. देवीं टोचण्याचें काम डायरेक्टर ऑप पब्लिक हेल्थ यांच्या हाताखालीं नेमलेल्या अधिकार्यांकडून केलें जातें.
१९१९ च्या सुधारणाकायद्यान्वयें या प्रांताच्या जमाखर्चाला निराळें स्वरूप आलें आहे. पूर्वी कांहीं उत्पन्नाच्या बाबी पूर्णपणें प्रांतिक सरकारच्या असून इतर बाबी प्रांतिक व वरिष्ठ सरकार या उभयतां मिळून होत्या. हल्ली नव्या कायद्यान्वयें प्रांतिक व वरिष्ठ सरकार यांच्या उत्पन्नाच्या बाबीं गदीं पृथ पृथ करण्यांत आल्या आहेत. प्रांतिक उत्पन्नाच्या सर्व बाबींचा वसूल प्रांतिक सरकार करतें, आणि त्यांतून वरिष्ठ सरकारला वार्षिक ५६ लाख रुपये खंडणी देतें. प्रांतिक उत्पन्नाच्या मुख्य बाबी, उत्पन्नावरील कर, जमीनमहसूल, अबकारी, स्टँप, रेजिस्ट्रेशन, जंगलें, कालवे, व इतर कांहीं कर इतक्या आहेत. यांशिवाय न्यायकोर्टे, तुरुंग, पोलिसखातें, बंदरें, शिक्षणखातें, सरकारी इस्पितळें, शेतकीखातें, औद्योगिक खातें इत्यादि खात्यांकडूनहि सरकारला कांहीं उत्पन्न मिळतें. याप्रमाणें या प्रांताचें एकंदर उत्पन्न १९२५-२६ सालीं सुमारें १४ कोटी होतें. १९१०-१९११ सालीं हें उत्पन्न सारें ७॥ कोटी होतें हें लक्षांत घेण्याजोगें आहे.
मुंबई इलाख्यांतील संस्थानेंः- हिंदुस्थानांतील एकंदर हिंदी संस्थानांपैकीं निम्म्याहून अधिक मुंबई इलाख्यांत आहेत. यासंबंधीं विशेष गोष्ट म्हणजे, या संस्थानांपैकीं पुष्कळशीं अगदीं लहान आहेत. एकटया काठेवाडद्वीपकल्पांत सुमारें २०० निरनिराळीं संस्थानें आहेत. इतक्या लहान प्रादेशिक विभागांनां संस्थानपद मिळण्याचें ऐतिहासिक कारण असें आहे कीं, येथें ब्रिटिश अंमल सुरू होण्याच्या वेळीं ज्या जमीनदारांनां दिवाणी व फौजदारी खटले चालविण्याचा अधिकार होता त्या सर्वांनां मांडलिक राजे उर्फ संस्थानिक असा दर्जा देण्यांत आला. राजसत्तेचा मुख्य नियम म्हणजे ज्येष्ठायत्त वारसापद्धत ही या लहान संस्थानांत चालू नसल्यामुळें संस्थानी प्रदेशाची सतत विभागणी होत असे. १८ व्या शतकांत अशा विभागणीमुळें राजपुतान्याप्रमाणें मुंबई इलाख्यांतहि अनेक लहान लहान संस्थानांत पोटविभागणी आणि अव्यवस्था चालू होती. संस्थानांसंबंधाचीं विविधता या इलाख्याइतकी हिंदुस्थानांत दुसर्या कोठेंहि नाहीं. यापैकीं मोठाली संस्थानें १८ व्या शतकांत मराठी साम्राज्याच्या अमदानींत उदयास आलीं. रजपूत संस्थानिकांचीं घराणीं बरीच जुनीं आहेत. फार प्राचीन काळांतील संस्थानें सचीन, जंजिरा व जाफ्राबाद हीं असून तेथील संस्थानिक परदेशांतून आलेल्या घराण्यांतले आहेत. प्राचीन काळीं ऍबिसीनियांतून व्यापारी जहाजें हिंदुस्थानांत येत असत, अशा जहाजांवरील अधिकारी येथेंच राहून त्यांनीं हीं संस्थानें स्थापिलीं आहेत. याशिवाय येथील मूळच्या भिल्ल, कोळी वगैरे देश्य लोकजातींच्या पुढार्यांनीं माही व नर्मदा या नद्याकांठच्या डोंगराळ प्रदेशांत संस्थानें निर्माण केलीं आहेत.
मुंबईसरकार या संस्थानांवर पोलिटिकल एजंटांच्यामार्फत नियंत्रण ठेवतें. या नियंत्रणाचा प्रकार मोठाल्या संस्थानांच्या बाबतींत सलजमसलत देणें इतक्याच स्वरूपाचा असतो. इतर संस्थानांच्या बाबतींत प्रत्यक्ष राज्यकारभारांत पोलिटिकल एजंटांनां कांहीं अधिकार असतो, आणि जेथील संस्थानिक अल्पवयी आहेत अशा संस्थानांचा सर्व कारभार सरकार आपले अधिकारी नेमून चालवितें. येथील कांहीं लहान संस्थानें दुसर्या मोठया संस्थानिकांची मांडलिक आहेत, त्यामुळें त्यांचा ब्रिटिश सरकारशीं प्रत्यक्ष संबंध नाहीं. तथापि अशा उपसंस्थानांचें अस्तित्व कायम राखण्याची हमी ब्रिटिशसरकारनें दिलेली असते. संस्थानिकांचे अधिकार, तह किंवा चालू वहिवाट याअन्वयें ठरविले गेले आहेत. काठेवाडांतील व इतर कांहीं लहान संस्थानिकांचे अधिकार इतके मर्यादित आहेत कीं, जमीनमहसूल वसूल करणें या अधिकाराखेरीज दिवाणी व फौजदारी खटले चालविणें वगैरे इतर कोणतेहि अधिकार त्यांस नाहींत.
'वेस्टर्न इंडिया स्टेट्स एजन्सी' अशी निराळी एजन्सी होण्यापूर्वी या इलाख्यांत ३७७ संस्थानें होती. त्यांचें क्षेत्रफळ ६३००० चौरस मैल आणि लोकसंख्या (१९२१) ७४०९४२९. यांच्या पुढील एजन्सी आहेतः- बेळगांव, एजन्सी १ संस्थान (सावंतवाडी); विजापूर एजन्सी- १ संस्थान (सावनूर); खेडा एजन्सी- १ संस्थान (खबायत); काठेवाड एजन्सी- १८७ संस्थानें (-मुख्य जुनागड, नवानगर, भावनगर, ध्रांगध्रा, पोरबंदर, मोरवी, गोंडळ); कुलाबा एजन्सी- १ संस्थान (जंजिरा); कोल्हापूर एजन्सी ९ संस्थानें (मुख्य संस्थान कोल्हापूर व ९ मांडलिक संस्थानें); महीकांठा एजन्सी ५१ संस्थानें (मुख्य संस्थान ईदर); नाशिक एजन्सी- १ संस्थान- (सुरगणा); पालनपूर एजन्सी- १७ संस्थानें (पैकीं मुख्य पालनपूर व राधनपूर); पुणें एजन्सी १ संस्थान (भोर); रेवाकांठा एजन्सी- ६२ संस्थानें (मुख्य संस्थान राजपिंपळा); सातारा एजन्सी २ संस्थानें (औंध व फलटण); सोलापूर एजन्सी- १ संस्थान (अक्कलकोट); सक्कर एजन्सी- १ संस्थान (खैरपूर); सुरत एजन्सी- ३ सस्थानें (बांसडा, धरमपूर व सचीन); ठाणा एजन्सी- १ संस्थान (जव्हार).
याशिवाय दक्षिण महाराष्ट्रांतील संस्थानांमध्यें सांगली, मिरज (सिनीअर व जूनिअर), कुरुंदवाड (सीनिअर व जूनिअर), जमाखिंडी, मुधोळ व रामदुर्ग यांचा समावेश होतो. या इलाख्यांत संस्थानांची संख्या फार असल्यामुळें त्यांपैकीं कांहीं हिंदुस्थानसरकारनें आपल्या प्रत्यक्ष नियंत्रणाखालीं घ्यावीं अशी सूचना माँटेग्यू चेम्सफर्ड-रिपोर्टांत केली होती. तदनुसार १९२४ सालीं काठेवाड, कच्छ व पालनपूर या तीन एजन्सीमध्यें येणारा सर्व प्रदेश स्टेट्स ऑफ वेस्टर्न इंडिया या नांवानें हिंदुस्थानसरकारनें आपल्या नियंत्रणाखालीं घेतला.
श ह र.- मुंबई इलाख्याचें मुख्य शहर. क्षेत्रफळ २२ चौरस मैल. लोकसंख्या ११७५९१४. मुंबई येथील अगदीं मूळचे रहिवाशीं जे कोळी त्यांची देवता 'मुंबा आई' तिच्या नांवावरून या शहराला मुंबई नांव पडलें आहे. बँकबेच्या आसपास जे प्रस्तरावशेष सांपडले आहेत त्यांवरून पाषाणयुगामध्यें येथें मनुष्यवस्ती असावी असें तज्ज्ञांचें मत आहे. ९ व्या शतकाच्या पूर्वी येथें कोळी लोकांची वस्ती होती. त्यावेळी मुंबई हें उत्तर कोंकणाचा भाग म्हणून गणलें जात होतें. अशोकाच्या साम्राज्यांत मुंबईचा अंतर्भाव होत होता असें दिसतें. ८१०-१२६० या काळांत शिलाहार घराण्याची मुंबई बेटांवर सत्ता होती. या घराण्याच्या अमदानींत वाळकेश्वराचे देवालय बांधण्यांत आलें व तें पहाण्यासाठीं मलबारसारख्या दूरच्या प्रदेशांतूनहि लोक येत असत म्हणून वाळकेश्वर ज्या टेंकडीवर वसलें होतें त्याला मलबार हिल्स् असें नांव पडलें. १२६० सालीं दक्षिणेचा राजा भीमदेव ह्यानें या ठिकाणाचा आश्रय केला आणि महिकावती उर्फ माहीम नांवाचें शहर वसविलें व प्रभावतीदेवीचें देऊळ बांधलें. अर्थात भीमदेवाचे पळशीकर ब्राह्मण, प्रभू वगैरे अनुयायी त्याच्याबरोबरच येथें रहावयास आले. १३४८-१५३४ च्या दरम्यान या बेटांवर मुसुलमानांची सत्ता होती; व त्यांच्या सत्तेखालीं माहीम हें लष्करी ठिकाण झालें. १६ व्या शतकांत उत्तरार्धांत पोर्तुगीज लोकांनीं हीं बेटें आपल्या ताब्यांत घेतलीं; व त्यांच्या अमदानींत येथें ख्रिस्ती धर्माची मंदिरें बांधलीं गेलीं. १६६१ सालीं दुसर्या चार्लसला पोर्तुगीज राजाकडून लग्नाची देणगी म्हणून हीं बेटें देण्यांत आली. १६६८ सालीं ब्रिटिश सरकारनें हीं बेटें ईस्ट इंडिया कंपनीला दिलीं व यानंतर कंपनीच्या अंमलाखालीं मुंबई हें महत्त्वाचें बंदर बनत चाललें. १८१८ सालीं पेशवाईसत्तेच्या शेवटानंतर दख्खनचा सर्व मुलूख कंपनीसरकारकडे आला व एलफिन्स्टन व फ्रीयर या गव्हर्नरांच्या कारकीर्दीत मुंबईची भरभराट झालीं. १८२७ सालीं टंकसाळ उघडण्यांत आली. १८३३ सालीं टाऊन-हॉल बांधण्यांत आला. १८५३ सालीं जी. आय. पी. रेल्वे मुंबई ते ठाण्यापर्यंत सुरू झाली. १८६० सालापासून कापसाच्या व्यापाराबद्दल मुंबईची प्रसिद्धि होऊं लागली, व गोद्या विद्युतगृहें, यांत्रिक कारखानें इत्यादि महत्त्वाच्या इमारती बांधण्यांत आल्या.
भौगोलिक वर्णनः- प्राचीन काळीं मुंबई हें निरनिराळया सात बेटांनीं बनलें होतें. हल्ली हीं सातीं बेटें मिळून एकच शहर झालें आहे. या शहराचें नैसर्गिक सौंदर्य फार अप्रतिम आहे. सर्व हिंदुस्थान याच्यासारखें दसुरें शहर नाहीं अशी याची ख्याति आहे. या शहराची लांबी ११॥ मैल व रुंदी ३ ते ४ मैल आहे. याच्या पूर्वेस व पश्चिमेस एकेक टेंकडी आहे. मुंबईचे दोन भाग पडतात. (१) शहर व (२) कोट (फोर्ट). कोटांत व्यापाराच्या पेढया, सरकारी कचेर्या व सुंदर इमारती आहेत. त्यांपैकीं मुख्य (बंदराजवळ) ताजमहाल हॉटेल, सेलर्स होम उर्फ खलाशांचें विरामस्थान, राजाबाई टावर, युनिव्हर्सिटी लायब्ररी, सेक्रेटरीएट, हायकोर्ट, निरनिराळया बँका, बांबेक्लब, टाऊनहॉल, यूरोपियनांचा जलविहारक्लब, राणीचा पुतळा इत्यादि होत. फोर्टसेंट जार्ज किल्लयाची येथें जुनी तटबंदी दृष्टीस पडते. मुंबईच्या संरक्षणासाठीं समुद्रांतील खडकांवर तटबंदी करून तेथें तोफा ठेविल्या आहेत. याखेरीज बेटाच्या निरनिराळया भागीं अशीच व्यवस्था केली आहे. महालक्ष्मी व मलबार पॉईंट येथेंहि तोफा ठेविल्या आहेत. कोटाच्या उत्तरेस बोरीबंदर, क्राफर्ड मार्केट, म्युनिसिपल ऑफिस, वगैरे इमारती आहेत. कोटामध्यें यूरोपियन लोकांची वस्ती आहे. त्याच्या उत्तरेस मुख्य भरवस्तीचा भाग आहे. यांत मुंबादेवीचें देऊन आहे. भायखळयाच्या जवळ राणीचा बाग आहे. परळच्या भागांत मुंबईतला गिरण्या आहेत. मलबार व खंबाला टेंकडयावरून रात्रीच्या वेळी मुंबई शहराचा फारच मनोहर देखावा दृष्टीस पडतो. त्याचप्रमाणें राजाबाई टावरवरून बंदराचा भाग नजरेस पडतो.
देवळेंः- महालक्ष्मीचें देऊळ, वाळकेश्वर, बाबुलनाथ व मुंबादेवी हीं जुनीं हिंदु देवस्थानें असून गेट ऑफ मर्सी हें ज्यू अथवा यहुदी लोकांचे पवित्रस्थान पायधुणीच्या उत्तरेस आहे. जुम्मामशीद ही शहरांत भरवस्तींत आहे.
हवामानः- मुंबईंत उष्णता अथवा थंडी तीव्र कधींच नसते. सुमारें ७१ इंच पाऊस पडतो. हवा दमट असते. जूनपासून सप्टेंबरपर्यंत पावसाळा, मे व आक्टोबर महिन्यांत उन्हाळा व डिसेंबरपासून मार्च महिन्यापर्यंत हिंवाळा असतो. साधारण उष्णमान ७९.२ अंश असतें.
मुंबईच्या म्युनिसिपालिटींत ७२ सभासद आहेत. त्यांपैकीं ९६ सरकारनियुक्त व ५६ लोकनियुक्त असतात. कार्पोरेशनचा अध्यक्ष प्रतिनिधींनीं निवडावयाचा असतो. कार्यकारी खात्याचा मुख्य एक सरकारनियुक्त कमिशनर असतो. मुख्य उत्पन्नाची बाब म्हणजे घरपट्टी होय.
शिक्षणसंस्था- मुंबईस मुंबई विश्वविद्यालय आहे.याशिवाय एलफिस्टन, विल्सन, सेंटझेवियर, सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स, एकॉनमिक्स इन्स्टिटयूट, सेकंडरी टीचर्स कॉलेज, गव्हर्मेंट लॉ स्कूल, ग्रँट मेडिकल कॉलेज, व शेट गोवर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज हीं कॉलेजें आहेत, व शिवाय एक ''राष्ट्रीय'' दुय्यम प्रतीची पाश्चात्य वैद्यकाची शाळा आहे. त्याशिवाय 'जे जे स्कूल ऑफ आर्ट' नांवाची शिल्पशिक्षणविषयक संस्था आहे व व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिटयूट ही यंत्रशिल्पाची शिक्षणसंस्था आहे व शिवाय येथें एक सरकारी वेधशाळाहि आहे.
व्यापार व दळणवळणः- मुंबई हें परदेशी मालाच्या आयात-निर्गतीचें व व्यापाराचें केंद्र आहे. १९२३-२४ सालीं २०४४ बोटीं मुंबई बंदरांत आल्या व गेल्या. दळणवळणासाठीं लोकल्स आगगाडया सुरू करण्यांत आल्या आहेत. गांवात विजेच्या ट्रामगाडया आहेत. चेंबर ऑफ कॉमर्स नांवाचें एक व्यापारमंडळ आहे. त्यांत ११६ सभासद आहेत, व त्यांच्यातर्फे कायदेकौन्सिलांत एक सभासद निवडला जातो.
सूत व कापड रंगविणें, कातडीं कमावणें, धातुकाम करणें, इत्यादि अनेक धंदे आहेत. मुंबईमध्यें कापडाच्या व इतर मिळून ८२ गिरण्या आहेत व त्यांत एकंदर दीड लाख लोक कामावर आहेत. या गिरण्याच मुंबईचें वैभव आहे. माटुंगा येथें पुष्कळ मिठागरें आहेत. मुंबईस २५-३० वर्तमानपत्रें व मासिकें निघतात. त्यापैकीं ऍडव्होकेट ऑफ इंडिया, गुजराथी, इंडियन डेलीमेल, इंडियन सोशल रिफॉर्मर, नवाकाळ टाइम्स ऑफ इंडिया, क्रॉनिकल, मनोरंजन, इत्यादि प्रमुख आहेत. येथें क्लिअरिंग हाऊस, अनेक स्थानिक ब्यांका व निरनिराळया आशियाटिक व यूरोपीयन राष्ट्रांच्या ब्यांका आहेत. येथें शेअरबझार आहेत व प्रत्येक प्रकारच्या मालाचे निरनिराळे बाजार आहेत.
बंदराची व्यवस्था पहाण्यासाठीं व त्याची सुधारणा करण्यासाठी सरकारनें एक मंडळ नेमिलें आहे. त्यास ''पोर्टट्रस्ट'' म्हणतात. त्याचें उत्पन्न १९२४-२५ सालीं २७४ लाख होतें. शहराची सुधारणा करण्यासाठीं एक मंडळ स्थापन केलें आहे. त्यास इंप्रुव्हमेंट ट्रस्ट म्हणतात. १९२३-२४ सालीं या खात्यानें १५२६ लक्ष रुपये खर्च केले. पोर्टट्रस्ट, कार्पोरेशन व इंप्रुव्हमेंट ट्रस्ट या तिन्ही संस्थांनीं मुंबईची वाढ करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. बँकबेचें धरण बांधण्याचें काम सुरू आहे.