विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महानुभावपंथ, प्रा स्ता वि क.- सनातन हिंदुधर्मांत अनेक पंथ निर्माण झाले त्यांपैकीं एक महानुभावपंथ होय. याचें मूळ नांव महानुभाव असून त्यास समानार्थद्योतक महात्मापंथ असेंहि म्हणतात. महानुभाव या शब्दाचें अपभ्रष्ट रूप मानभाव हें हल्लीं लौकिकांत रूढ आहे. या पंथास गुजराथेंत अच्युतपंथ आणि पंजाबांत जयकृष्णिपंथ या नांवानें संबोधितात. अच्युत आणि जयकृष्णि हीं दोन्हीं नांवें या पंथीयांत प्रामुख्यानें रूढ असलेल्या श्रीकृष्णभक्तीवरूनच पडलीं आहेत.
पं था चा प्र सा र.- या पंथाचा उदय वऱ्हाडांत ॠद्धपूर येथें शालिवाहनाच्या १२ व्या शतकांत झाला, तथापि आज संबंध महाराष्ट्र, गुजराथ, इंदूर, संयुक्त प्रांताचा कांही भाग व पंजाब यांमध्यें या पंथाचा प्रसार झाला आहे, येवढेंच नव्हे तर या पंथाचीं कृष्णमंदिरें काश्मीर, काबूल, येथें असून या पंथाचे अनुयायी गझनी कंदाहारपर्यंतहि पसरले आहेत. हा पंथ वऱ्हाडांत अस्तित्वांत आला असून या पंथाचे मूळ धर्मग्रंथ मराठी भाषेंत आहेत.
पं थ स्था प ने चा उ द्दे श.- आद्यशंकराचार्यांनीं जैन, बौद्ध इत्यादि धर्मांचें खंडण करून सनातन ब्राह्मणधर्माचें पुनरुज्जीवन केलें तें सरासरी ४ शतकें अव्याहत राहिल्यामुळें हिंदु समाजामध्यें वर्णभेदाची असह्यता भासूं लागली. ह्यांतच धर्मग्रंथ संस्कृतमधून असल्यामुळें इतर वर्णांनां ब्राह्मणवर्णाचें धर्मसंबंधी श्रेष्ठत्व अवश्य मानावें लागत असे. अशा परिस्थितींत महाराष्ट्रांत सर्व वर्णांच्या एकीकरणाचे आणि भेदभाव सौम्य करण्याचे प्रयत्न १२ व्या शतकांत झाले. त्यांतीलच हा महानुभावीयांचा पंथ होय.
पं थ सं स्था प क च क्र ध र या चें च रि त्र.- या पंथाचा संस्थापक श्रीचक्रधर हा होय. याचें चरित्र लीलाचरित्र, मूर्तिप्रकाश इत्यादि ग्रंथांत आलें आहे. सुमारें ८०० वर्षांपूर्वी गुजराथ देशांत भरवस (भडोच) येथें हरपालदेव नांवाचा राजा होता तोच पुढें चक्रधर नांवानें प्रसिध्दीस आला. या चक्रधराविषयीं अनेक चमत्कारीक कथा आहेत. त्यानें शके ११८५ मध्यें संन्यासदीक्षा घेतली व तेव्हांपासून शिष्यसंप्रदाय वाढविला व महानुभावपंथाची स्थापना केली. चक्रधरानें प्रसाराचें कार्य शके ११८५ पासून शके ११९४ पर्यंत केलें व पुढें वयाच्या ११ व्या वर्षी उत्तरापथी वदरकिदारकडे गमन केलें.
पं था च्या उ प शा खा उ र्फ आ म्ना य.- चक्रधराचे सुमारें ५०० पेक्षांहि जास्त शिष्य असून तो स्वतः गुजराथी होता तरी पंथप्रसाराचें कार्य महाराष्ट्रांत झालें. शिष्यांपैकीं नागदेवाचार्य, महिंद्रभट्ट, जनार्दन, दामोदर, भांडारेकार इत्यादि प्रमुख होते, त्यांत पंथप्रसाराचें कार्य विशेषतः श्रीनागदेवाचार्य यानेंच केले. नागदेवाच्या शिष्यांच्या प्रमुख तेरा शाखा झाल्या. त्या शाखांच्या परंपरा अद्यापि सुरू आहेत. त्यांस आम्नाय असें म्हणतात. या आम्नायांमध्यें कवीश्वर, उपाध्याय आणि पारमांडल्य यांचा विशेष पसार आहे. बसवाप्रमाणेंच चक्रधरहि ब्राह्मण होता पण निराळा पंथ स्थापन करीत असतांना यानें वेदानुयायित्व आणि वर्णाश्रमधर्म यांचा त्याग केला नाहीं हें विशेष आहे.
म हा नु भा व पं थां ती ल व र्ग.- महानुभावपंथाच वेद प्रमाण असून चातुर्वर्ण्यव्यवस्था आणि वर्णाश्रमधर्महि मान्य आहेत. हा पंथ ब्राह्मणांनीच काढला असून पंथस्थापनेपासून सरासरी तीनशें वर्षेपर्यंत ब्राह्मण आचार्यत्वाखालींच पंथप्रसार होत होता. महानुभावांचे दोन वर्ग आहेत; एक उपदेशी आणि दुसरा संन्याशी. उपदेशी वर्ग चातुर्वर्ण्य आणि जातिधर्म व तदनुरूप संस्कार पाळणारा आहे. यांचे लग्नादिव्यवहार पंथेतर सजातीयांशीं होतात. म्हणजे महानुभावीय पंथाचा गृहस्थाश्रमी ब्राह्मण असला तर ब्राह्मणधर्मानुरूप सोळा संस्कार पाळीत असून त्याचे लग्नादि व्यवहार सजातीय ब्राह्मणांशींच हल्लींहि होतात. तथापि त्यानें महानुभावीय संन्यासदीक्षा घेतली तर मात्र जातिनिर्बंध पाळण्याची त्यास जरूर नाहीं. स्त्रीशूद्रादि सर्वांस संन्यास घेतां येतो व अशी दीक्षा घेतल्यावर मग अस्पृश्येतर संन्याशांमध्यें जातिनिर्बंध पाळीत नाहींत, हा या पंथांत विशेष आहे. तसेंच हिंदूंच्या देवतांपैकीं दत्तात्रय आणि श्रीकृष्ण हे परमेश्वराचे पूर्णावतार मानतात व बाकीच्या देवतांचे अवतार अंशरूपानें मानतात. यांनीं भारतांतर्गत श्रीमदभगवद्गीता हा मुख्य धर्मग्रंथ मानून तदंतर्गत अहिंसा इत्यादि तत्त्वांचा अवलंब जनतेस निवृत्तिमार्गास लावण्याकरितां केला, व संन्यास, ब्रह्मचर्य व भिक्षोपजीवित्व इत्यादि साधनांनीं स्त्रीपुरुषादि सर्व वर्णांनां मोक्षास लावण्याचा उपक्रम केला.
म हा नु भा वां चीं वे दा न्तां ती ल म तें- श्रीमदभगवद्गीता हा मुख्य धर्मग्रंथ मानिल्यामुळें चक्रधरकालापासून आजवर या ग्रंथावर अनेक महानुभावीय मराठी टीका झाल्या. त्या सर्व द्वैतपर आहेत. प्रकृति आणि पुरुष हे भिन्न असून जीव व शिव हे भिन्न आहेत. परमेश्वर हा निर्गुणनिराकार आहे पण कृपावशें तो साकार होतो. माया ही निर्गुणनिराकार आहे पण कृपावशें तो साकार होतो. माया ही निर्गुणाला सगुणत्व आणते व जीवाला जीवत्व देते, म्हणजे जीवाकडून ती सर्व व्यापार करविते असें हे प्रतिपादितात. या देहांत मनुष्य आपल्या पूर्वकर्मानुसार फळें भोगतो आणि कर्मानुसारच (स्वर्ग, नरक, कर्मभूमि व मोक्ष) या चतुर्विध कर्मफलास पावतो अशी यांची समजूत आहे.
म हा नु भा वां चे आ द्य ध र्म ग्रं थ.- श्रीकृष्ण हा अवतार मानल्यामुळें श्रीकृष्णलीलावर्णनपर भागवताचें दशम आणि एकादश स्कंद हे पूज्य मानतात आणि तसेंच चक्रधराच्या मुखांतून निघालेलीं उपदेशपर वाक्यें जशींच्यातशीच त्याचा शिष्य महींद्रभट्ट यानें लीलाचरित्र या ग्रंथांत ग्रथित केलीं आहेत, त्यांपैकीं कांही केशवराजसूरी यानें निवडून एकत्रित केलीं. चक्रधराच्या मुखांतून निघालेल्या वाक्यांतस सूत्र असें म्हणतात व या संग्रहास सिध्दांतसूत्रपाठ असें नांव दिलें आहे. ही चक्रधराची संहिता महानुभावीयांनीं कानामात्रेचाहि बदल न होऊं देतां जशीच्यातशीच संरक्षण केली आहे, व त्यास आदिग्रंथ मानून ते त्याचा नित्य पाठ करतात. हीं एकंदर १६०९ सूत्रें असून त्यांचीं ११ प्रकरणें आहेत.
म हा नु भा वां स मा न्य अ स ले ले अ व ता र.- चक्रधरास महानुभाव परमेश्वराचा अवतार मानतात. दर युगास महानुभाव लोक परमेश्वराचे अवतार झाल्याचें मानतात. हंस, श्रीदत्तात्रय, श्रीकृष्ण, प्रशांत आणि चक्रधर या अवतारांनां पंचकृष्ण म्हणून मानतात.
पंथाची भाषा (मराठी).- चक्रधरानें पंथाचें कार्य विदर्भांत आणि महाराष्ट्रांत केलें. त्याचा शिष्यसमुदाय महाराष्ट्रीय होता. सर्व वर्णांतील स्त्रीपुरुषांकरितां हा पंथ स्थापन केल्यामुळें या पंथाचे ग्रंथ संस्कृतमध्यें न होतां मराठींतूनच करावे लागले. याशिवाय चक्रधराची उपदेशसूत्रें महिंद्रभट्टादि शिष्यांनीं मराठींतूनच एकत्रित केलेलीं आहेत. या सर्व कारणामुळें या पंथाची भाषा मराठी ठरली, व या पंथचा प्रसार करणारी मंडळी प्रथम तीनशें वर्षे निव्वळ आणि नंतरहि बहुधां महाराष्ट्रीय असल्यामुळें या पंथाचें सर्व लिखाण बहुतांशीं मराठींतच निर्माण झालें आहे. मराठी बोलणाऱ्या हिंदुं समाजांत जे अनेक पंथ आहेत त्यांत महानुभावपंथाइतकें मराठी वाङ्मय कोणाहि पंथांत नाहीं एवढेंच नव्हें तर इंग्रजी अंमलापूर्वीच्या इतर मराठी वाङ्मयाशीं तुलना केली असता महानुभावीय मराठी वाङ्मयाचें एकंदर वाङ्मयांत प्रधान्यच दिसेल.
ज्ञा ने श्व री पू र्व म हा नु भा वी य म रा ठी ग्रं थ.- ज्ञानेश्वरी शके १२१२ त लिहिली. ज्ञानेश्वर व मुकुंदराय या दोन ग्रंथकारांशिवाय अद्यापपर्यंत तत्पूर्वीचे मराठी ग्रंथकार अथवा त्यांचे मराठी स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध नाहींत. ही उणीव महानुभावीय मराठी ग्रंथ उपलब्ध नाहींत. ही उणीव महानुभावीय मराठी ग्रंथ उपलब्ध झाल्यामुळें भरून निधाली आहे. ज्ञानेश्वरीपूर्वी सरासरी २५-३० वर्षांचे गद्य, ओंवीबद्ध आणि विविधवृत्तांत रचिलेले महानुभावीय मराठी ग्रंथ आज पहावयास मिळतात. त्यांत महिंद्रभट्टाचें लीलाचरित्र (सुमारें शक ११९५) हा गद्य ग्रंथ, भास्कर कवीचा ओंवीबद्ध शिशुपालवध (शके ११९५) आणि श्रीमदभागवत एकादशस्कंद (शके ११९६) तसेंच त्याचें गद्य श्रीकृष्णचरित्र, भावेदेवव्यास याचा गद्य पूजावसर, केशवव्यास व गोपाळपंडित यांचे सिध्दांतसूत्रपाठ (गद्य), केशवव्यास याचा ओंवीबद्ध मूर्तिप्रकाश (शके १२०६), गायनाचार्य दामोदर पंडित याच्या 'साठचौपद्या' व ओंवीबद्ध वत्सहरण (शके १२००), नरेंद्र कवीचें ओंवीबद्ध रुक्मिणीस्वयंवर (शके १२००) हे ग्रंथ भाषा व साहित्य या दृष्टीनें अत्यंत महत्त्वाचे आहेत; याशिवाय केशवव्यास, कवीश्वरव्यास, लक्ष्मींद्र भट्ट देऊळवाडेकर आणि निवृत्तिदेव वाठोडेकर इत्यादिकांच्या सरासरी ७।८ भगवद्गीतेवरील मराठी गद्य व ओंवीबद्ध टीका उपलब्ध आहेत.
म हा नु भा वी य वा ङ्म या ची वि वि ध ता.- ज्ञानेश्वरीनंतरहि विविध विषयात्मक मराठी गद्य व पद्य वाङ्मय महानुभावीयांनीं तयार केलें आहे. त्यांत चरित्रात्मक, स्थलवर्णनात्मक, पुराणें, काव्यें वगैरे ग्रंथांचा भरणा आहे. समाजांत धार्मिक मराठी ग्रंथांचा अभ्यास करावा लागत असल्यामुळें अनेक टीका, टीपाग्रंथ आणि कोश व व्याकरणग्रंथ आणि साहित्य व छंदः शास्त्रावरील ग्रंथ निर्माण झाले आहेत. या ग्रंथभाण्डाराची यथार्थ कल्पना प्रस्तुत लेखकाच्या 'महानुभावीय मराठी वाङ्मय' या पुस्तकावरून येईल.
सू त्र पा ठा व री ल म हा नु भा वी य म रा ठी वा ङ्म य:-- यांचें वाङ्मय कसकसें वृध्दिंगत होत गेलें हें त्यांच्या एकाच ग्रंथाच्या इतिहासावरून दिसून येईल. महिंद्रव्यासानें प्रथम चक्रधराचा चरित्रात्मक असा 'लीलाचरित्र' ग्रंथ लिहिला. त्यांतून आणि चक्रधरमुखांतून ऐकिलेल्या उपदेशांतून निवडक वाक्यें एकत्र करून केशवव्यासानें त्यांस सूत्रनांव देऊन सूत्रपाठ तयार केला. हीं सूत्रें समजण्याकरितां चक्रधरानें जे दृष्टांत सांगितले त्यांचा केशवव्यास यानें एक स्वतंत्र भाग बनविला. या सूत्रांचे पंडित रामेश्वरानें (श. ११९८ ते श. १२४० पर्यंत) विषयानुरोधानें निरनिराळे ११ भाग पाडले. पुढें (शके १२४७ च्या सुमारास) पारिमांडल्य आम्नायाचा मूळ पुरुष जो गोपाल पंडित यानें त्या सूत्रांची अन्वयव्यवस्था लावली. हीं निरनिराळीं सूत्रें चक्रधरानें कोणकोणत्या प्रसंगी सांगितलीं हें ''प्रकरणवश'' ग्रंथांत सांगितलें आहे. तो ग्रंथ परशुरामानें केला असा समज आहे. हीं सूत्रें सांगण्यांत चक्रधरचा हेतु काय होता, हें न्यायव्यासानें शके १२७५ त ''हेतुस्थल'' या ग्रंथांत सांगितलें. याच्या पूर्वीच यांपैकी कांही सूत्रांवर 'लापनिक' व 'दृष्टांतिक' हे ग्रंथ गर्भितार्थ सांगण्यासाठीं रचले गेले. यावर शके १४०० च्यासुमारास चक्रपाणी यानें या सूत्रांत अमुक शब्द कां योजिले व ते त्याच ओळीनें कां योजिले वगैरे स्पष्ट करून 'लापिका' या नांवाचा मोठा ग्रंथ लिहिला. याशिवाय 'भाष्य, ' 'महाभाष्य', 'व्याख्या', 'प्रमेय', वगैरे ग्रंथ आहेतच. भाष्यामध्यें शब्दार्थ विशद करून सांगितला आहे; व महाभाष्यांत, भाष्यांत अर्थ विशद करतांना योजिलेल्या शब्दांचाहि स्पष्ट अर्थ केला आहे; यांत अनेक व्याख्या असून निरनिराळया समानार्थक शब्दांचे भेद दाखविले आहेत. याशिवाय 'टाचण' म्हणजे टिपणी-ग्रंथ आहेत हे टिपणी-ग्रंथ 'सूत्रा' संबंधानेंच नसून भागवत, गीता, शिशुपालवध इत्यादि काव्यग्रंथांवरहि आहेत. या टिपणीवरून रचलेला एक तत्कालीन अर्थ देणारा शब्दकोशहि आहे. यांचे जेवढे म्हणून ग्रंथकार व कवी होऊन गेले ते झाडून सारे संन्याशी अथवा संसारापासून अलिप्त होते.
म हा नु भा वी य लि पी.- अनेक कारणांमुळें आपली ब्रह्मविद्या, आपलीं धर्ममतें इतरांपासून गुप्त ठेवण्याची आवश्यकता या पंथीयांस नागदेवानंतर ५० वर्षांच्या आंतच भासूं लागली. या कार्याकरितां महानुभावपंथाच्या निरनिराळया आम्नायांनीं निरनिराळया संकेतलिपी तयार करून त्यांत आपले ग्रंथ लिहिले आहेत. अगदी प्रथमच्या अशा 'सगळ लिपी' व 'सुंदरी लिपी' ह्या होत. सगळ लिपी ही रवळोव्यासानें शके १२७५ च्या सुमारास काढिली व सुंदरी लिपीचा जन्म शके १२८५ च्या सुमारास झाला. त्या नंतर लवकरच शके १२९० च्या सुमारास पारमांडल्य लिपि निर्माण झाली. आज महानुभावांच्या २६ लिपी अस्तित्वांत आहेत. लिपी निघाल्यानंतर लिपींत प्रती करून पूर्वी सरळ मराठींतील ग्रंथ नष्ट केले. लिपी फक्त महानुभावीयांनांच परंपरागत कळावयाची असल्यामुळें व आपले धर्मग्रंथ इतरांना कळूं नयेत म्हणून गुप्त ठेवण्याची प्रवृत्ति या पंथांत रूढ झाल्यामुळें हें ग्रंथभांडार इतर पंथीयांस आजपर्यंत गुप्त राहिलें असें म्हणतात. संकेत असले तरी निरनिराळया लिपींमध्यें मूळ वर्णास सांकेतिक वर्ण योजिल्यामुळें तत्कालीन शब्दांचीं रूपें वगैरे आजहि पहावयास मिळतात.
या पंथासंबंधानें परकी भाव येवढेंच नव्हे पण तिरस्कारहि आज हिंदुसमाजामध्यें कां रूढ आहे याची मीमांसा करणें अवश्य आहे. यांची कारणें महानुभावीयांच्या इतिहासांतच मिळतील. शके १२७५पासून आपले धार्मिक ग्रंथ महानुभावीयांनीं गुप्त ठेवावयास प्रारंभ केला; त्यांतच इतर हिंदुसमाजाशीं ते फटकून राहूं लागले. देवगिरीकर कन्हरराय, महादेवराय आणि रामदेवराय जाधव या तिन्ही राजांनीं चक्रधर आणि त्याचा पट्टशिष्य नागदेव यांच्या भेटी घेऊन त्यांचा आदर केला. त्यानंतर देवगिरीचें राज्य नष्ट होण्यापूर्वी कांहीं वर्षे अगोदर वऱ्हाड हा मुसुलमानांच्या अमलांत गेला व मागून देवगिरीचें हिंदु राज्यहि नष्ट झालें, व मुसुलमानांकडून हिंदु धर्माचा छळ सुरू झाला. तेव्हां अशा छळापासून आपलें व आपल्या पंथाचें संरक्षण व्हावें म्हणून महानुभावीयांनां प्रयत्न करावे लागले. या पंथामध्यें मूर्तिपूजा तेव्हां रूढ नव्हती. कृष्ण, दत्तात्रय, चक्रधर इत्यादि अवतारांच्या चरणस्पर्शानें पवित्र झालेलीं स्थळें, तीर्थें येवढेंच नव्हे पण तेथील संबंधीं पाषाणहि महानुभाव पवित्र मानूं लागले व अशा पवित्र स्थळीं त्यांनीं आपले ओटे बांधले. इकडे इतर हिंदु मूर्तिपूजक असल्यामुळें अर्थातच नुसते ओटे बांधवून तीं स्थळे पवित्र मानणारे लोक हे मूर्तिपूजक हिंदूंपासून भिन्न आहेत असा मुसुलमानांचा समाज झाला. त्याचा फायदा घेऊन आपल्या पंथाचें रक्षण व्हावें म्हणून मुनिव्यास (कमळाकर अयाचित कोठी) या कुमराम्नायांतील पाताळयंत्री पुरुषानें चवदाव्या शतकांत तत्कालीन एका मुसुलमानी बादशहाकडून एक फर्मान मिळवून सर्व महाराष्ट्रभर आपल्या पंथाचे 'ओटे' बांधले. पैठण, आपेगांव, फल्टण, वेरूळ इत्यादि ठिकाणीं प्राचीन देवालयांत व कित्येक ठिकाणीं मुसुलमानांनीं उध्वस्त केलेल्या हिंदूंच्या देवालयाच्या प्राकारांतहि हे ओटे बांधले. त्यामुळें आधींच मूळ सनातन चातुर्वर्ण्यप्रमाण अशा हिंदुधर्माविरुद्ध शूद्रांनां सुद्ध संन्यासदीक्षेचा अधिकार देणारा, आपले धर्मग्रंथ गुप्त ठेवणारा व इतर हिंदूंशीं फटकून वागणारा हा पंथ या ओटे बांधण्याच्या लालसेनें अखिल महाराष्ट्रीय हिंदु समाजाचा द्वेषविषय बनला. तसेंच जीझिया कर टाळण्यासाठीं आणि भगवीं वस्त्रें परिधान करणाऱ्या सनातन हिंदुधर्मीय संन्याश्यापासून आपण भिन्न आहोंत हें दाखविण्यासाठीं महानुभाव संन्याशांनीं भगवीं वस्त्रें टाकून काळीं वस्त्रें धारण केली आणि मुसुलमान सुलतानांच्या जवळून स्वतःस ज्या सनदा मिळविल्या त्यांत स्वतःस ''शाहपोश'' काळीं वस्त्रें परिधान करणारे असें उपपद लिहवून घेतलें. या सर्व कारणांमुळें हा महानुभवीय पंथ इतर हिंदुधर्माचा द्वेषविषय व तिरस्काराचाहि विषय झाला. हा तिरस्कार आणि द्वेष एकनाथ महाराज, तुकाराम आणि वामन पंडित इत्यादि ऐतिहासिक कालीन विद्वान संतांच्या काव्यांतहि आढळून येतो, तसेंच हिंदुधर्मीय सामान्य जनतेच्या आचारविचार आणि उच्चार यांतहि दिसून येतो. महानुभावांचें सकाळीं नुसतें दर्शनच काय पण नुसतें नांव घेतलें तरी अपशकुनच समजण्यांत येतो. 'करणी कसाबाची,बोलणी मानभावाची', 'शुद्ध मानभावीपणा, 'मानभावाची बायको' इत्यादि वाक्प्रचार आणि म्हणी द्वेषाच्या आणि तिरस्काराच्या द्योतक होत. हा द्वेष व तिरस्कार इतका विकोपास गेला कीं महानुभावीयांचे अनुयायी उपदेशी वर्ग जो गृहस्थाश्रमी असून आपल्या जातिधर्माप्रमाणें व वर्णाश्रमधर्माप्रमाणें वागतो तो उघडपणें आम्हीं महानुभावपंथाचे अनुयायी आहोत असें सांगण्याचें सुद्धंधैर्य करीत नाहीं. या पंथासंबंधी लोकांत बरेच गैरसमज आहेत. पण ते कमी होत चालले आहेत ही आनंदाची गोष्ट आहे.
म हा नु भा व पं था ची यो ग्य ता व का म गि री.- हा पंथ एका हिंदु ब्राह्मणानें स्थापन केला व या पंथाचें आचार्यत्व पहिलीं तीनशें वर्षे ब्राह्मण-कुलाकडेच होतें. या पंथानें आपलें वेदानुयायित्व सोडिलें नाहीं. उपनिषेदं, गीता, भागवत इत्यादि ग्रंथ पूज्य मानिले. श्रीदत्तात्रय आणि श्रीकृष्ण हे अवतार मानले, अहिंसा तत्त्वाचा प्रसार पंजाबसारख्या यवनप्रधान देशांत केला व महाराष्ट्रांतील मानलेल्या वर्गांतहि अहिंसा तत्त्वाचा उपदेश करून त्यांनां मद्यमांसापासून निवृत्त केलें, मराठी भाषेचा प्रसार गझनी, काबूल, कंदाहारपर्यंत केला. यांनीं काबूल येथें कृष्णमंदिर बांधिले असून तेथील पहिला महंत नागेंद्रमुनि विजापूरकर या नांवाचा दक्षिणी ब्राह्मण होता. काबूल येथें यांचे मराठी ग्रंथ आहेत. काबूलचा अमीर दोस्तमहंमद याचा प्रधान चरणदास आणि काश्मीरचा राजा गुलाबसिंह याचा सेनापति सरदार भगत सुजनराय जगनसुवाला हे महानुभावीय उपदेशी असल्यामुळें त्यांनीं आपल्या अमदानींत मराठी ही आपली धार्मिक भाषा मानली. आज सुद्ध पंजाबमध्यें कित्येक धनिक व्यापारी, सरकारी अधिकारी व विद्वान गृहस्थ हे महानुभावीय उपदेशी असून आपली धार्मिक भाषा मराठीच मानतात. कांहीं दुर्मिळ महानुभावीय मराठी ग्रंथ पेशावरकडे आढळतात. या पंथाचा पंजाबांत प्रवेश प्रथम शालिवाहनाच्या १५ व्या शतकांत झाला व यांचे ग्रंथ छापण्याचा उपक्रम पंजाबांत लाहोर, पेशवार येथें सन १८९९ मध्यें झाला. अगदीं प्रथम छापलेलें पुस्तक १५ व्या शतकांतील गोपाळदास दर्यापूरकर यांचें मराठी गद्यांत भगवद्गीतेवरील टीका हें होय. सुमारें तीस वर्षांपूर्वी लाहोरास मराठी आरत्यासंग्रह उर्दू लिपींत छापविला होत्या. नंतर कांहीं ग्रंथ महाराष्ट्रांत छापविले गेले पण महानुभावीयांची विशेषतः महाराष्ट्रीय महानुभावीय ग्रंथसंग्रहाची माहिती पंथाबाहेर प्रसिद्ध करावयाची प्रवृत्ति अजूनहि नाहीं तथापि माहूरचे महंत दत्तराज आणि करसाल, पंजाब येथील म. हरीराज उर्फ गोपीराज यांनीं प्रसिध्दीकरण चालविलें आहे. रा. वि. ल. भावे आणि रा. य. खु. देशपांडे यांनीं महानुभावीय ग्रंथांसंबंधी थोडीबहुत माहिती पुढें आणिली आहे, तसेंच महानुभवीय महंत मंडळींनीं नुकत्याच (१९२५) भरलेल्या महानुभावीय परिषदेंत पंथांतील मंडळानेंच महानुभावीय ग्रंथ आपल्या देखरेखेखालीं छापून प्रसिद्ध करावेत असा ठराव पास केला आहे. तो अमलांत आल्यास या पंथाचे मूळ ग्रंथ वाचावयास मिळाल्यामुळें या पंथाचें खरें स्वरूप जनतेच्या नजरेस पडेल.
(संदर्भग्रंथः- केसरी ता. २१-१/-१८९९ व १९-१/-१९०७ मधील लो. टिळकांचे महानुभाव पंथासंबंधी लेख; टाईमस् ऑफ इंडिया ता. १५-१/-१९०७ मधील कै. डॉ. भांडारकर यांचा इंग्रजी लेख; कै. हरि नारायण आपटे यांचें 'मराठी वाङ्मयाचा अभ्यास'; भावे कृत महाराष्ट्र-सारस्वत; महानुभावीय कविकाव्यसूचि; महाराष्ट्र भाषासरस्वतीच्या महालांतील अज्ञात दालन; रा. य. खु. देशपांडे कृत महानुभावीय मराठी वाङ्मय; महानुभावीय कांहीं प्रकाशित व अनेक अप्रकाशित हस्तलिखित ग्रंथ.) (य. खु. देशपांडे.)
(महानुभावी संकेतलिपीच्या उलगडयाचा आद्य मान रा. वि. का. राजवाडे यानां आहे. त्यानीं, प्रथम एक जुनें मानभावी काव्य ग्रंथमालेंत प्रसिद्ध केलें. धुळयाचे कै. गो. का. चांदोरकर व पुण्याच्या भा. इ. सं. मंडळांतील कांही संशोधक यांनीं या पंथासंबंधानें रा. देशपांडे व रा. भावे यांच्या ग्रंथापूर्वीच अनेक शोधात्मक माहिती प्रसिद्ध केली आहे ती अवश्य पहावी.) (संपादक)