विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जरा - जरा म्हणजे म्हातारण. याची व्याख्या सोपी व उघड आहे; पण वाटते तितकी ती सोपी नाहीं. म्हातारपण म्हणजे पांढरे केंस एवढा अर्थ घेतला तर शाळा कॉलेजांतील मुलांचेहि केंस पांढरे होण्यास आरंभ झालेले दिसतात. शरीराचीं गात्रें, व मानसिक शक्ति क्षीण होणें, दांत पडणें, वगैरे लक्षणें घेतलीं तरी आपल्या देशांत व परदेशांत व्यक्तिपरत्वें कांहीं माणसें चाळिशीच्या सुमारस वृद्ध दिसूं लागतात; व कांहीं माणसांची साठी उलटली तरी त्यांची तडफ, तरतरी प्रजोत्पादन सामर्थ्य नष्ट होत नाहीं. ७० च्यां पुढें मात्र वार्धक्याची लक्षणें शरीरांत दिसतातच. म्हातारपण वाईट कां तर या अशक्ततेमुळें. गंजलेल्या हत्याराप्रमाणें घरीं स्वस्थ बसणें व चिडक्या स्वभावामुळें व रोगांच्या पीडेमुळें स्वतःचें व इतरांचें जीवित कष्टमय करणें ही परम करुणास्पदच स्थिति आहे असें नाकबूल करणें शक्य नाहीं. म्हातारपण कोणास आवडतें असें नाहीं. तरी तें आपणास क्रमानें येणें प्राप्तच आहे असें समजून ज्या अर्थी कांहीं वृद्ध लोक परपीडनास कारण न होतां संसारांतील आनंदांत आपल्या निरोगी व तेजस्वी रहाणीनें भर टाकतात, तसें आपणासहि वृद्धपणीं करतां यावें ही उमेद प्रत्येकानें धरली पाहिजे; व त्यासाठीं प्रयत्न केला पाहिजे. आपले जुने आचार आरोग्यकारक व वार्धक्यहितकारक असेच प्रायः आहेत. तथापि नवीन मतें काय आहेत व तीं नवीन वैद्यशास्त्राच्या कोणत्या तत्त्वांवरुन रुढ झालीं आहेत हें कळावें व वार्धक्यांतील हालअपेष्टा आपणास अंशतः अगर पूर्णपणें कशा टाळतां येतील एतदर्थ सूचक उपाय सुचविले आहेत त्यांचें मनन व अभ्यास करावा.
(१) बालपणीं रोगराई इजा वगैरे क्रमप्राप्त संकटें आली तर ज्वर, दुःख, सर्व शारीरिक चलबिचल फार जोरानें होते; परंतु हींच स्थित्यंतरें म्हातारणीं झालीं असतां तीं वैद्यास ओळखतां येतील अशीं वरील ज्वर, वेदनादि बाह्य लक्षणें एवढीं तीव्र नसतात व म्हणून वृद्ध मंडळींतील रोगाचें निदान लवकर न झाल्यामुळें रोग वाढीस लागण्याचा संभव असतो. उदाहरणार्थ, पित्तनलिकाशूल अगर मूत्र नलिकाशूल यांसारख्या तरुण रोग्यास रडविणार्या व लोळविणार्या भयंकर वेदना वृद्धपणीं सह्य असतात, असें पुष्कळदां पहाण्यांत येतें. वृध्दांच्या अंमांतज्वर असूनहि तो उष्णतानलिकेस तितका लागत नाहीं; व म्हणून म्हातार्या माणसाचें उष्णतामान कळण्यास कित्येक वेळां तोंडामध्यें थर्मामिटर धरल्यानें खरा ताप कळतो. म्हातार्या मंडळींचें रोगनिदान करण्याची संवय वैद्यास हवी. वैद्य फसला जाण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे नाडी व श्वास अगर ताप व नाडीचे ठोके यांचें जें एरवीं व ज्वरांमध्यें प्रमाण तरुण रोग्यांत आढळतें तेंच प्रमाण वृद्ध रोग्यांत नसतें. यामुळें रोगस्थिति वैद्याच्या लक्षांत न येण्याचा संभव बराच असतो. (२) शरीरांतील जोम कमी झाला म्हणजे परोपजीवी त्वचा, रोगकारक जंतू नाना तर्हेचे त्वचारोग उत्पन्न करतात. वार्धक्यावस्था अशापैकींच अनुकूलस्थिति असल्यामुळें उवा (डोक्यांत व अंगावर), खरुज, नायटे, गजकर्ण, इसब, कंडुरोग व इतर त्वचारोग न व्हावेत अशी त्वचेची काळजी व एकंदर प्रकृतीची निगा अगोदरपासून ठेवावी. याउपर त्वचारोग झाल्यास योग्य त्या उपायांनीं त्याचें शमन व निर्मूलन करून त्यास वाढूं व उलटूं देऊं नये. (३) वार्धक्यामध्यें जठर व आंतडीं यांतील पचनक्रियेंत मंदत्व असल्यामुळें तत्संबंधीं रोग होतात हें साहजिक आहे. परंतु या वयांत अन्नमार्गांत व यकृतादि पचनेद्रियांत क्यान्सर होण्याचा संभव असतो. हा रोग असाध्यच आहे. तथापि त्याच्या शमनारथ् योग्य ते उपाय करावे. जठर व लघु अंत्र या ठिकाणीं व्रणरोग होतो व तो योग्य उपचारांनीं बरा होतो. शौचास साफ न होणें यामुळें बरेच वृद्ध लोक जिकीरीस येतात व या बद्धकोष्ठतेमुळें नाना पीडा व मूळव्याध वगैरे नाना व्याधी उद्भवतात. मलशुद्धि वेळेवर न झाल्यामुळें कोठ्यांत विषें सांचून तें विषशोषण रक्तामध्यें होतें व त्यामुळें वार्धक्यास अकालीं आरंभ होतो असा मेचिनकॉफ या महा शोधकाचा शोध आहे. तो म्हणतो कीं सस्तन प्राण्यांमध्यें मोठ्या आंतड्याची वाजवीपेक्षां जास्त लांबी लांब गटाराप्रमाणें निसर्गदत्त असल्यामुळें आतड्यांच्या शिथिल स्थितीमध्यें तेथें सांचलेला मळ कुजतो व त्या विषशोषणामुळें अकालीं वार्धक्य येतें व अगोदर असलेंले वार्धक्य वाढतें. मत्स्यामध्यें हें गटाररुपीं आंत्र नसतें म्हणलें तरी चालेल; सरपटणारे प्राणी व पक्षी यांमध्यें हें आंतडें फार लहान असतें म्हणून हे सर्व प्राणी सस्तन व मानवीप्राण्यांप्रमाणें जर्जर होऊन आत्मविषशोषणानें खितपत पडत नाहींत. यास पुढील उपाय करणें-बस्ती घेणें, सौम्य रेचकें घेणें, आहारांत योग्य प्रकारचें अन्न, फळें, भाज्याचा उपयोग करणें, आग्यनियमपूर्वक रहाणी ठेवणें, विरजलेलें दहीं व ताक रोज आहारांत उपयोगांत आणणें व जंतुनाशक औषधें पोटांत घेणें, व आरोग्यपूर्वक रहाणी ठेवणें हे मोचिन कॉफच्या मतें उपाय आहेत. आंत्रासंबंधीं अंतर्गळ हा रोगहि वृद्धवस्थेंत उद्भवण्याचा संभव असतो; त्या रोगावरील उपाय त्या सदरांत वाचावयास मिळतील. (४) हृदय व रक्तवाहिन्यांतील रोग वार्धक्यांत होतात; कारण त्यांतील लवचिकपणा कमी होऊन त्यांत काठिण्य आलेलें असतें. या अनेक रोगांवरील उपाय त्या त्या स्थळीं प्रस्तुत कोशांत सांपडतील; परंतु या बदलेल्या रचनेमुळें म्हातारपणीं अतिअंगकष्टाचे श्रम करूं नयेत. (५) नाना तर्हेचे मज्जास्थानांच व मज्जातंतूचे रोग उद्भवण्यास हा काल अनुकूल असल्यामुळें मज्जातंतूदाह, अर्धांगवायु वगैरे अनेक सदराखालीं याविषयीं माहिती दिली आहे. येणेंप्रमाणे ढोबळ व मुख्य वार्धक्यासंबंधी रुग्णावस्थेचें दिग्दर्शन मात्र येथें केलें आहे.
वर कथन केलेंच आहे कीं, कोणास अकालीं ३५।४० च्या वयांत म्हातारपण येतें व कांहीं जणांस साठसत्तरानंतर जरा दिसूं लागते. अशी विषमता कां असावी याचें उत्तर त्या माणसांची विविक्षित प्रकृति हें होय. प्रकृति म्हणजे काय याचें उत्तर आजपर्यंत देणें कठीणच होतें. परंतु आतां बरेंच समाधानकारक उत्तर सांपडलें आहे तें असें. बालवयामध्यें शरीराचा बांधा कसा मजबूत होईल याची म्हणजे शरीरांतील आयात माल जें अन्न तें पचून त्याचे स्नायू, अस्थिमज्जा व रक्त यांत रुपांतर व्हावें ही अपेक्षा असते. यौवनावस्थेनंतर व वृद्धवस्थेंत ही वाढ बंद होते व वार्धक्यांत तरी निदान शरीरांतील निर्यात मालाचीच निर्यात म्हणजे मलशुद्ध, लघवी (यूरीक अँसिड), घाम यांचा निकाल बरोबर रीतीनें व्हावा ही अपेक्षा असते. ज्यांच्या शरीरांत ही निर्यात उत्तम चालते त्यांच्या रक्तांत विषशोषण न झाल्यामुळें त्यांची प्रकृति चांगली असें म्हणावें; मग त्यांचे वय साठसत्तर असलें तरी जरा त्यांनां जराहि पीडा करीत नाहीं. परंतु ज्याच्या शरीरांत ही निर्यात नीट चालत नाहीं ते मात्र आपआपल्या विषशोषणानें जशी चुलींतील राख न काढली व आंत हवा लागू न दिली तर तींतील विस्तव विझूं लागतो तसे हे लोक अकालीं आपले विषांची निर्गत बंद होऊन वृद्ध होतात व त्यांची प्रकृति वाईट असते असें म्हणावें. शरीरांतील आयात व निर्यात यास आयव्यय व्यापार म्हणतात; व तिची बरोबर मोजदाद व नियमन करणारी अंतःस्त्रावक पिंडसंस्था नामक विविध रसोत्पादक पिंडांचा समुदाय असतो. याविषयी थायराइडपिंडवृद्धि रोग या लेखांत समाविष्ट असलेला अंतःस्त्रावक पिंडचिकित्सा हा लेख पहावा. हे पिंड वृषण, स्त्रीअंडाशय, पिच्युइटरी, पाइनियल, मूत्र पिंडावरील ग्रंथि, प्रक्रियास वगैरे पिंड असून त्यांचा अधिपति थॉयराइड नामक पिंड आहे. हे सर्व पिंड एकएकटे व संघशक्तीनें शरीरयंत्राची मानसिक, शारीरिक, जननसंबंधीं व आयव्ययव्यापारादि क्रिया आपोआप व घड्याळाप्रमाणें बिनचूक व बिनबोभाट चालवितात अशी त्यांची नियामक शक्ति आहे; व त्यांतील रसांचा औषधाप्रमाणें किंबहुना औषधीपेक्षां उत्तम उपयोग होतो. वृद्ध माणसांनीं आहार कमी करावा हें वरील आयव्ययाच्या वर्णनावरून कळेलच; परंतुं कित्येकदां ही गोष्ट वृद्धमाणसांस व त्यांच्या कनवाळू आप्तेष्टांस नीटशी कळत नाहीं व ते शक्ति येण्यासाठीं त्यांनां पौष्टिक अन्न देत असतात. वृध्दांनां युक्तआहार म्हणजे मासे व मत्स्य वर्ज करून फळें व न शिजविलेले व पचण्यासारखे वनस्पतिपदार्थ होत. ह्यांत आबालवृध्दांस हितावह असा व्हायट्यामिननामक पदार्थ असल्यामुळें हे पदार्थ देणें उत्तम; हा पदार्थ गुराढोरापासून दूध, दहीं, साय, ताक, मलइ, खव्यांत असल्यामुळें हे पदार्थ व अंडीं, कांकडी, टोम्याटो, खजूर, केळीं व इतर भाज्या व फळें हीं खावींत. कंदभाज्यापेक्षां पाले व फळभाज्या चांगल्या; आणि मांसमत्स्याशनापेक्षां शिजवलेलें शाकान्न वृद्धास चांगलें. कोणी म्हणतात माणसास चिंता नसावी. चिंतेनें शरीर जळतें व तें म्हणणें शरीरांतील अंतःस्त्रावक पिंड विकृत झालें असतां खरेंहि असेल; परंतु सुधारलेल्या देशांतील रणधुरंधर, वीर, मुत्सुदी, शोधक लोक, कर्ते लोक यांनीं लढाईच्या वेळीं व शांततेच्या वेळीं मोठ्या राष्ट्रांनी व शिवाय आपली खासगी चिंता वाहूनहि आपली शरीरप्रकृति प्रायः नीट राखिली असे दाखले नेहमीं आढळतात. यावरून मनोव्यापार जोरानें चालले म्हणजे शरीरहि चालतें असा उलट व सुलट संबंध आहे असें वाटतें. हत्यार गंजून वाया जाण्यापेक्षां झिजून गेलेलें बरें अशी म्हण आहे. शरीररुपीं यंत्रास हा गंज न चढावा एतदर्थ वृध्दांस गंज घालविणारें उत्तम औषध म्हणजे कांहीं तरी बेताचा सदुद्योग त्यांनां असणें हें होय. येणेंप्रमाणें वृद्धावस्थेंसंबंधीं मुख्य बाबीचा विचार येथें केला आहे. या कामीं पाश्चात्यांचे दीर्घ प्रयत्न केवढे चालू आहेत यासंबंधीं आणखी चमत्कारिक व विश्वसनीय माहिती देऊन हा विषय पुरा करूं.
पुरुषांच्या शुक्रग्रंथी अगर वृषण यांचें काम फक्त वीर्य उत्पन्न करण्याचेंच नसून तें अनेक प्रकारचें असतें असें खच्ची केलेल्या प्राण्यांवरील व मनुष्यांवरील परिणाम पाहून समजून आलें आहे. तेव्हां या पिंडांत शुक्राखेरीज अन्य आंत्ररस निर्माण होत असून तो रक्तप्रवाहमार्गे शरीरांत खेळून पुरुषत्वाची इतर अंतर्बाह्य लक्षणें उत्पन्न करण्यांत व आरोग्य व तारुण्य जतन करण्याच्या कामीं उपयोगांत येतो. वृषगांतील हा रस ''लीडिग्ज पेशी'' नामक रचनेमध्ये तयार होतो व असाच रस स्त्रीअंडाशयांत तयार होऊन स्त्रीगुणविशिष्ट जे मार्दवादि गुणधर्म ते त्यांनां प्राप्त होतात असा निश्चित शोध लागला आहे. या रसांनां ''स्त्री हारमोन् व ''पुरुष हारमोन'' अशीं नांवे दिलीं आहेत. शुक्र शोणितांचा संयोग होऊन गर्भधारणा होते तेव्हां यापैकीं या दोन ''हारमोन'' पैकीं जें अधिक असेल त्याप्रमाणें गर्भाला स्त्रीचें अगर पुरुषांचें स्वरूप प्राप्त होतें असें प्रयोगांवरून सिद्ध होतें.
तारुण्याचें पुनरुज्जीवन (स्टायनॉकचा प्रयोग) - वृषणाची वीर्यवाहक नलिका शस्त्रानें उघडी करून ती बांधून व काढूनहि टाकतात. म्हणजे त्यामुळें वीर्योत्पादक भाग नष्ट होतो. व दुसर्या म्हणजें आंत्ररसोत्पादक भागांत वृद्धि होऊन नवतारुण्यास आरंभ होतो. यास सहा महिने तरी लागतात. ज्यांनीं ही शस्त्रक्रिया केली आहे ते शस्त्रवैद्य म्हणतात कीं ही बिनधोक्याची क्रिया आहे.
डॉ. व्हारोनॉफ नामक विख्यात शस्त्रवैद्य माकडाच्या वीर्यग्रंथीचें कलम मनुष्याच्या वृषणांत लावून देतात व तें एकदां जडलें म्हणजे कित्येक वर्षें चांगलें काम देतें. इतर प्राण्यांच्या वीर्यग्रंथी एकंदरींत निरुपयोगी ठरतात. माकडाचे वीर्यग्रंथीचे चारपांच तुकडे एकमेकांस न लागतील असे माणसांच्या वृषणाच्या थैलींत (ती कापून उघडी करून) ठेवतात. ६०।६५ वर्षापेक्षा म्हातारे लोक उपयोगी नाहींत. प्रथम थट्टा झाली तरी पुढें हे शस्त्रप्रयोग सफळ झाले. शरीरांतील शैथिल्य नष्ट होऊन जोम व तरतरी येऊन उल्हास वाटतो व काम अधिक करवतें. सातशें लोकांनां हा रस टोंचल्यानें प्रत्येकांस फायदा झालाच; शिवाय दमेकर्यांचा दमा गेला व क्षयरोग्याची शक्ति वाढली.
आर्यवैद्यकांत रसायनतंत्र किंवा जराचिकित्सा म्हणून चिकत्सेचें एक अंग आहे. या चिकित्सेंत रसायनें वापरण्याविषयीं सांगितलें आहे. या रसायनाच्या सेवनानें आयुष्य शंभर वर्षांहूनहि अधिक वाढवितां येतें असें लिहिलें आहे. या रसायनांत दोन प्रकार आहेत. (१) कुटी प्रावेशिक व (२) वातातपिक. हे प्रकार घेतांना कोणकोणत्या परिस्थितींत रोग्यानें राहिलें पाहिजे याची सविस्तर माहिती रसायन तंत्रांत आहे. सोमरसायन घेतल्यानें म्हातार्याला तरुणपणाचीं कशीं लक्षणें होतात हें निरनिराळ्या सोमवनस्पतींच्या गुणधर्मासह सुश्रुतकारांनीं विवेचिलें आहे. याखेरीज इतर वनस्पती व चूर्णे जरेवर सांगितलीं आहेत.