विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चातुर्मास्य - आषाढ शुक्ल एकादशीपासून अथवा पौर्णिमेपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत अथवा पौर्णिमेपर्यंत होणार्या चार महिन्यांस चातुर्मास्य अशी संज्त्रा आहे. चातुर्मास्याच्या आरंभीं जी एकादशी असते तिला शयनी एकादशी म्हणतात आणि समाप्तीला जी एकादशी असते तिला बोधिनी म्हणतात. मनुष्याचें वर्ष म्हणजे देवांची एक अहोरात्र. दक्षिणायन ही देवांची रात्र आणि उदगयन हा देवांचा दिवस होय. उदगयन कर्कसंक्रांतील होत असतें व कर्कसंक्रांति आषाढ महिन्यांतच असते. शयन म्हणजे झोंप घेणें. देव आषाढ शुद्ध एकादशीला झोंप घेतात; म्हणून तिला शयनी असें नांव पडलें आहे; आणि कार्तिक शुद्ध एकदशीला उठतात, म्हणून तिला बोधिनी हें नांव पडलें आहे. देवांची रात्र म्हणजे मनुष्यांचे ६ महिने आहेत. परंतु देवांच्या शयनाचा काल चारच महिने आहे. अर्थात् रात्रीचा एकतृतीयांश शिल्लक आहे तोंच देव जागे होतात आणि व्यवहार करूं लागतात.
देव चातुर्मास्यामध्यें निद्रा घेत असतात, तेव्हां असुरांपासून रक्षण होण्याविषयीं आपण फारच सावध असलें पाहिजे. चातुर्मास्यामध्यें कांहीं तरी व्रत केल्याशिवाय राहूं नये असें धर्मशास्त्र सांगतें.
आषाढ शुक्ल एकादशीस उपोषण करून पुरूषानें चातुर्मास्यापर्यंत ( चार महिने ) शुचिर्भूत राहून व्रत करण्यास सुरूवात करावी असें भारतांत सांगितलें आहे व निर्णयसिंधु, धर्मसिंधु वगैरे ग्रंथांतून चातुर्मास्यसंबंधीं विशेष व्रतेंहि कथन केलीं आहेत. त्याप्रमाणेंच:-
वार्षिकांश्चतुरो मासान्वाहयेत्केनचिन्नर:|
व्रतेन नोचेदाप्रोति किल्बिषं वत्सरोद्भवम् ||
असें वचन भारतामध्येंच असून त्याचा अर्थ “पावसाळ्याचे चार महिने कोणतें तरी व्रत करून पुरूषानें काढावे. नाहीं तर संवत्सरसंबंधीं सर्व कांहीं पातक त्याला प्राप्त होतें” असा आहे. तेव्हां चातुर्मास्यामध्यें पुरूषानें आपल्या शक्तीच्या मानानें कांहीं तरी नियम धरणें अवश्य आहे. चातुर्मास्यसंबंधीं व्रताचा आरंभ कर्तव्य असल्यास गुरूशुक्रांच्या अस्ताचा अथवा खंडतिथीचा दोष नाहीं. कारण,
न शैशवं नवा मौढ्यं शुक्रगुर्वोर्न वा तिथे:|
खण्डत्वं चिन्तयेदादौ चातुर्मास्यविधौ नर:|
असें वृद्धगार्ग्यस्मृतींत वचन असून तें चतुर्वर्गचिंतामणींत घेतलेलें आहे. भविष्यपुराणामध्यें श्रावण महिन्यांत शाक, भाद्रपदांत दहीं, आश्विनांत दूध आणि कार्तिकांत द्विदल वर्ज्य करण्यास सांगितलें आहे. स्कंदपुराणामध्यें पहिल्या तीन महिन्यांत वरील प्रमाणेंच अनुक्रमें तीन पदार्थ वर्ज्य सांगून कार्तिकांत द्विदल, बहुबीज आणि वांगें वर्ज्य करावयास सांगितलें आहे आणि हीं चातुर्मास्यव्रतें नित्य आहेत असेंहि स्कंदपुराणांतच म्हटलें आहे. त्याचप्रमाणें पांढर्या मोहर्या तांबडा मुळा, कोहळा, ऊंस, बोरें, आंवळा आणि चिंच हीं चातुर्मास्यांत वर्ज्य करावयास सांगितलीं आहेत. प्रसंग विशेषीं जीर्ण झालेला आवळा घेण्याची अनुज्त्रा आहे. त्याचप्रमाणें माचा, पलंग वगैरेंवर शयन, ऋनुकाल नसतांना स्त्रीसंभोग, मांस, मद्य, परान्न व पडवळ हीं वर्ज्य करावीं. बहुवीज कार्तिकांत वर्ज्य करावें असें वर सांगितलें आहे. तेथील बहुबीज ह्या शद्धाचा अर्थ एकापेक्षां अधिक बिया ज्यांत आहेत तें, असा कांहीं ग्रंथकारांनीं केलेला असून कांहीं निबंधकारांनीं इतर अंशांपेक्षां बीजाचाच अंश ज्यांत जास्त असेल तें, असा अर्थ केला आहे.
चातुर्मास्यामध्यें वांगें, कलिंगड, बेल, उंबर आणि जळलेलें अथवा करपलेलें अन्न ज्याच्या उदरांत जिरतें त्याच्यापासून ईश्वर फारच दूर रहातो असें आचार्यप्रदीपांत सांगितलें आहे. ब्रह्मचर्य, शुचिर्भूतपणा, सत्य आणि आमिषवर्जन हीं चार व्रतें चातुर्मास्यामध्यें श्रेष्ठ आहेत असें देवलस्मृतींत म्हटलें आहे. प्राण्याचा अवयव, चर्मातील उदक, ईडलिंबू, महाळुंग, यज्त्रशेष नसलेलें, ईश्वराला निवेदन न केलेलें, करपलेलें अन्न, मसुरा आणि मांस हें आमिष होय; असें पद्मपुराणांत सांगितलें असून ज्या ज्या देशांत जो जो रूचिकर पदार्थ मिळतो तो चार महिने वर्ज्य करावा असेंहि पद्मपुराणांत सांगितलें आहे.
परंतु कार्तिकमहात्म्यामध्यें गाय, शेळी आणि म्हैस ह्यांच्यावांचून कोणतेंहि दूध, धान्यांपैकीं मसुरा, शिळें अन्न, द्विजापासून विकत घेतलेले सर्व रस, भूमींतील मीठ, तांब्यांच्या भांड्यांत ठेविलेलें गाईचें दूध, दहीं, ताक, लोणी वगैरे, डबक्यांतील पाणी आणि स्वत: करितांच तयार केलेलें अन्न हें आमिष होय असें म्हटलें आहे. पावटेहि चातुर्मास्यांत वर्ज्य करावे म्हणून सांगितलें आहे. चार महिन्यांत जो हविष्यभक्षण करितो तो पापापासून अलिप्त राहतो असेंहि विष्णुधर्मांत सांगितलें असून अग्नीवांचून पक्व केलेलें धान्य मूग, यव, तीळ वाटाणें, कांग, देवभात, कंद, सैंधव, समुद्रजन्य मीठ, गाईचें दहीं व तूप, साय न काढलेलें दूध, फणस, आंबा, पिंपळी, जिरें. जुनी चिंच, नारिंग, केळें, आंवळे, गुळावांचून इतर इक्षुपदार्थ, तेलांत न तळलेलें वगैरेची गणना हविष्यांत केलेली आहे. अगस्तिसंहितेमध्यें नारळहि हविष्यांत सांगितला आहे. भविष्यपुराणांत विशिष्ट पदार्थ वर्ज्य करण्यापासून प्राप्त होणारीं फलेंहि सांगितलीं आहेत. गूळ वर्ज्य केला असतां पुरूष जन्मांतरी मधुर स्वरानें युक्त असा राजा होतो; तेल वर्ज्य केल्यानें कांति प्राप्त होते. योगाभ्यास केल्यानें ब्रह्मपद प्राप्त होतें. तांबूल वर्ज्य केल्यानें भोग प्राप्त होतात. घृताचा त्याग केल्यानें सौंदर्य प्राप्त होऊन शरीर तुळतुळीत होतें. शाकपत्रावरच उचजीविका केल्यानें भोग प्राप्त होतात. पक्व अन्न वर्ज्य केल्यानें पुरूष निर्मल होतो. भूमीवर अथवा पाषाणावर शयन केल्यानें मुनित्व प्राप्त होतें. धरणेंपारणें केल्यानें ब्रह्मलोक प्राप्त होतो; नखें व केंस वाढविल्यानें गंगास्नानाचें फल मिळतें; मौनव्रत धारण केलें असतां अप्रतिहत आज्त्रा चालू लागते. नेहमीं भूमीवर भोजन केल्यानें पृथ्वीपतित्व प्राप्त होतें. मुखानें स्तुति करून ईश्वराला शंभर प्रदक्षिणा घातल्या असतां पुरूष हंस जोडिलेल्या विमानांत बसून स्वर्गाला जातो. अयाचित व्रतानें धर्माला अनुसरून वागणारे असे पुत्र प्राप्त होतात. तिसर्या दिवशीं एक वेळ भोजन करणारा कल्पायु होतो. ज्यानें गूळ वर्ज्य केला असेल त्यानें गुळानें भरून सुवर्णासहवर्तमान ताम्रपात्र दान करावें. लवणवर्जनाचाहि विधिहाच आहे. चातुर्मास्यामध्यें जो शिवालयांतील अथवा विष्णूच्या देवालयांतील अंगण सारवून त्याच्यावर पंचरंगी स्वस्तिकें व कमळें काढितो त्याला रूद्रलोक प्राप्त होऊन गाणपत्य मिळतें. असो. एकभुक्त व्रत करणार्यानें दंपत्यास गोप्रदान करावें. नक्त व्रत करणार्यानें दोन वस्त्रें द्यावीं. धरणेंपारणें केल्यास गाय द्यावी. भूमीवर शयन केल्यास शय्या द्यावी. तिसर्या दिवशीं एक वेळ भोजन केल्यास गोप्रदान करावें. तांदूळ, गहूं वगैरे धान्य सोडल्यास तें तें धान्य सोन्याचें करून द्यावें. शाखाभक्षण अथवा पयोव्रत केल्यास गोप्रदान करावें. दहीं, मध व घृत वर्ज्य केल्यास वस्त्रदान व गोप्रदान करावें. ब्रह्मचर्यानें वागल्यास सुवर्णाची प्रतिमा दान करावी. तांबुलाचा त्याग केल्यास दोन वस्त्रें द्यावीं. मौन धारण केल्यास घृतकुंभ, दोन वस्त्रें आणि घंटा ह्यांचें दान करावें. देवासमोर रांगोळी काढण्याचा नेम केला असल्यास दुभती गाय व सुवर्णकमल द्यावें. चार महिने दिवा लाविल्यास दिवा आणि दोन वस्त्रें द्यावीं. भूमीवर अथवा पानावर भोजन केल्यास कांस्यपात्रदान व गोप्रदान करावें. चार रस्ते फुटतात तेथें दीप लाविल्यास अथवा गोग्रास घातल्यास गाय व बैल हीं दान द्यावींत शंभर प्रदक्षिणा घातल्यास वस्त्रदान करावें आणि अमुक द्यावें असें ज्याबद्दल विशेष सांगितलें नसेल त्याबद्दल सुवर्णदान व गोप्रदान सामान्यत: समजावें. चातुर्मास्यामध्यें अभ्यंग वर्ज्य करावें आणि समाप्ति झाल्यावर तिळाच्या तेलांनें भरलेला घट द्यावा. [ धर्ममासिक, १. ]