विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गागाभट्ट व त्याचें घराणें- गागाभट्टाचें घराणें हे मूळचें पैठणचें होते. दुर्गादेवीच्या दुष्काळांत (इ. स. १४६७-७५) पैठण व पुणतांबें येथें मोठी प्राचीन संस्कृत विद्यापीठें होती. त्यांचा आश्रय बंद पडून महाराष्ट्रांतील जीं अनेक पंडित घराणीं देशत्याग करून काशीस जाऊन राहिली त्यांतच गागाभट्टाचेंहि घराणें असावे. सन १४५० च्या सुमारास गोविंदभट्ट नांवाचा विश्वामित्रगोत्री ॠग्वेदी ब्राह्मण (आश्वलायन सूत्री) पैठणास रहात होता. गोविंदभट्टाचा पुत्र रामेश्वरभट्ट याचें पैठणास विद्यापीठ असून तें शिष्यवर्गानें गजबजून गेलेलें असे. या विद्यापीठास गाधिजवंशानुचरित्रांत 'श्रीरामचंद्राच्या सैन्याची छावणी' अशी उपमा दिली आहे. निजामशहानें रामेश्वर-भट्टाचा बहुमान केला होता. पण त्याजवर लवकरच दुष्काळामुळें देशत्याग करण्याची पाळी आली. तो विजयानगरच्या कृष्णदेवरायास भेटून द्वारकेस जात असतां रस्त्यांत त्यास नारायणभट्ट नांवाचा पुत्र झाला (इ. स. १५१४). द्वारकेस शिष्यशाखा व विद्यापीठ स्थापून तो परत पैठणास येऊन चार वर्षे राहून मग काशीस गेला. काशीस गेल्यावर ह्या घराण्यांत अनेक विद्वार पुरुष निपजले. त्यांपैकीं पुष्कळांचे हिंदुधर्मशास्त्रावरील ग्रंथ हल्लीं उपलब्ध आहेत. रामेश्वराचे शिष्य हिंदुस्थानांतील सर्वप्रांतीय होते. रामेश्वर हे रामोपासक होते. गोविंदभट्ट व रामेश्वरभट्ट यांनीं पुष्कळ ग्रंथ लिहिले पण ते हल्लीं उपलब्ध नाहींत. नारायणभट्टाचा लौकिक काशींत मोठा आहे. काशींतील विश्वेश्वराचे मंदिर नारायण भट्टानेंच बांधिलें. नारायण भट्ट काशीस असतां मोठा दुष्काळ पडला तेव्हां भट्टानें भागीरथींत अनुष्ठान करून विपुल पाऊस पाडविला, त्यामुळें मुसुलमान अधिका-यानें त्याचा हा प्रभाव पाहून विश्वेश्वराचें पाडलेलें मंदिर पुन्हां बांधण्याची त्यांस परवानगी दिली असें सांगतात. हा मोठा मीमांसक होता. त्याचे बारा ग्रंथ मार्तंड नांवानें प्रसिद्ध असून त्यांतील मुहूर्तमार्तंत हा स. १५७१ त लिहिलेला आहे. यानें बंगाल व बहार येथील पंडितांना जिंकिले. गया, काशी व प्रयाग या तीन क्षेत्रांत तीर्थविधि कसा करावा याबद्दलचा त्रिस्थळीसेतु नांवाचा ग्रंथ यानें लिहिला. राजा तोडरमल्लाचा व याचा चांगला स्नेह होता. त्यानें बंगालचा सुभेदार असतां बंगालचा (नवद्वीप) विद्यानिवास वंगोपाध्याय व मिथिला येथील इतर विद्वान पंडित यांचा व नारायणभट्टाचा वादविवाद करविला, त्यांत भट्टानें सर्व पंडितांस जिंकिले. याचा धर्मप्रवृत्ति हा ग्रंथ दक्षिणेंत व प्रयोगरत्न गंथ उत्तरेकडे प्रमाणभूत मानितात. प्रयोगरत्नासच नारायणभट्टी नांव आहे. (याचें गुजराथी भाषांतर बडोद्यास झालें आहे). यानें वेदांत विषयांत अनेक संन्याशांशीं वाद करून त्यांनां जिंकिलें. अकबराच्या दरबारीं याची मोठी प्रतिष्ठा होती. त्याचे मुलगे रामकृष्णभट्ट व शंकरभट्ट हे विद्वान असून त्याचे ग्रंथ सर्वमान्य आहेत. तंत्रवार्तिकव्याख्या, ज्योतिष्टोमपद्धति व जीवत्पितृकनिर्णय हे रामकृष्णाचे व द्वैतनिर्णय आणि आचाररत्न हे शंकराचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. प्रख्यात सिद्धांतकौमुदीकर्ता भट्टोजी दीक्षित हा शंकराचा शिष्य होय.
शंकरभट्ट याचा पुत्र नीलकंठभट्ट हा व्यवहारमयूख इत्यादि बारा मयूखांचा कर्ता आहे. रामकृष्णभट्ट दिनकरभट्ट (दिवाकरभट्ट), कमलाकरभट्ट व लक्ष्मणभट्ट असे तीन पुत्र होते. हे तिघेहि मोठे मीमांसक म्हणून प्रसिद्ध आहेत. पैकीं दिनकरभट्टाचे बारा ग्रंथ दिनकरोद्योत संज्ञेचे आहेत. कमलाकरभट्टानें कमलाकर संज्ञेचे बारा ग्रंथ लिहिले. पैकीं निर्णयकमलाकर यासच निर्णयसिंधु असें म्हणतात.
हा ग्रंथ त्यानें स. १६१२ त रचला. याचे पूर्तकमलाकर, शांतिकमलाकर, शूद्रकमलाकर, विवाहकमलाकर हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. लक्ष्मणभट्टाचे आचाररत्न वगैरे ग्रंथ आहेत. कमलाकराचे अनंत, प्रभाकर व श्याम असे तीन पुत्र होते. अनंताचा रामकल्पद्रुम ग्रंथ प्रसिद्ध आहे. वर आलेला नीलकंठभट्ट हा १७ व्या शतकाच्या आरंभ बुंदेलखंडांत सागरवंशी भगवंतदेवाच्या दरबारीं होता आणि त्याच्या आज्ञेवरूनच नीळकंठानें १२ मयूख केले. याचा भाऊ दामोदर यानें द्वैतनिर्णय परिशिष्ट वगैरे ग्रंथ लिहिले. नीळकंठाचा मुलगा शंकर याचे व्रतार्क वगैरे बारा 'अर्क' प्रसिद्ध आहेत.
गागाभट्ट हा दिनकरभट्टाचा पुत्र असून त्याला बापानें गागा असें लाडकें नाव दिलें व तेंच पुढें प्रसिद्ध झालें. त्याचें खरें नांव विश्वेश्वर होतें. त्यानें उत्कृष्ट विद्या संपादन करून आपल्या घराण्याचा लौकिक वाढविला. काशीस राहिल्या वरहि ह्या घराण्याचे शरीरसंबंध दक्षिणेंत होत असत. शिवदिननाथाचा गुरु केसरीनाथ हा गागाचा मामा होता. मीमांसा, न्याय, अलंकार व वेदान्त या विषयांत गागा भट्टाची प्रवीणता विशेष होती. दिनकरोद्योत ग्रंथांत त्याच्या बापानें पुष्कळ विषय सोपे म्हणून सोडून दिले होते त्यांची पूर्तता गागाभट्टाने केली. त्यामुळें हेमाद्रीच्या चतुर्वर्गाचिंता मणींप्रमाणेंच दिनकरोद्योताची योग्यता मोठी आहे. जैमिनी सूत्रांवर गागाभट्टाची टीका आहे. शिवाय न्यायशास्त्रावरील भट्टचिंतामणि व कायस्थधर्मप्रदीप उर्फ गागाभट्टी हे त्याचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. गागाभट्ट शके १५९५ (स. १६७३) त दक्षिणेंत आला व शके १५९६ च्या हिंवाळयांत काशीस गेला असा अंदाज आहे. या सुमारासच बाळाजी आवजीनें गागाभट्टाकडून कायस्थधर्मप्रदीप उर्फ गागाभट्टी रचून घेतला. तो बहुधा शके १५९६ तील ज्येष्ठ शु. १३ व वद्य ९ यांच्या दरम्यान संपूर्ण झाला असावा. छत्रपतींच्या ग्रंथालयांत न्यायाधीश व पंडितराव या पोथीचा उपयोग करीत. कायस्थांचे धर्म आचार व संस्कार बाळाजी आवजीच्या संमत्तीनें गागाभट्टानें ठरवून दिलें. यांत महाराजांच्या राज्यारोहणाचा उल्लेख आहे. यांत वेदमंत्राचे अर्थ संस्कृत अनुष्टुप्छंदांत आणून ठेविले असून सर्व संस्कार अमंत्रक दिले आहेत. राजवाडे यांनां सातारकर महाराजांच्या दप्तरांत एक पोथी सांपडली तींत हा कायस्थधर्मप्रदीप व शिवराजप्रशस्ति अशीं दोन प्रकरणें आहेत. काव्य ह्या दृष्टीनें प्रशस्तांची किंमत तसल्याच इतर प्रशस्तांहून अधिक नाहीं. ती शके १५९५ च्या मार्गशीर्षानंतर रचलेली दिसते. प्रशस्तींत मुसुलमानांचा निर्देश दैत्य शब्दानें केला आहे व महाराजांनीं ब्राह्मणरक्षण व श्रुतिस्मृतिशास्त्रांचा उद्धार केला असें म्हटलें आहे. तसेंच विजापूरकर वहलोल खानाची छाती फोडल्याचा (पराभव केल्याचा शके १५९५ चा) हि उल्लेख आहे.
गागाभट्टाच्या विद्वत्तेसंबंधानें दक्षिणेंत मोठा लौकिक असून दक्षिणेंतील ब्राह्मणवृंदावर त्याची छाप मोठीं होती. त्यास मराठी राज्याचा व दक्षिण पंडितांचा विशेष अभिमान असून शिवाजीचा लौकिक माहित होता. त्याच्या मनांत शिवाजीविषयीं आदर असल्यामुळें त्यानें मुद्दाम दक्षिणेंत येऊन आणि पैठण वगैरे ठिकाणच्या अनेक विद्वानांचें अनुमत घेऊन शिवाजीचा राज्यभिषेक नेटानें पार पाडला, शिवाय महाराष्ट्रराज्यसंस्थापना ही महाराष्ट्रीय पंडिताकडून होण्यांत एक प्रकारें औचित्यहि होतें.
सोळाव्या व सतराव्या शतकांत हिंदुस्थानांतील राजे रजवाडयांच्या व मुसुलमान बादशहांच्या दरबारीं या घराण्यांतील विद्वान पुरुषांस मोठा मान मिळत असून धर्म-कृत्याच्या प्रसंगीं त्यांस बोलावण्यांत येत असे. अद्यापीहि बनारस येथें त्या घराण्यास अग्रपूजेचा मान मिळतो. भट्ट घराण्यास ''ते जनतेचें (सेवा करणारें) घराणें होतें'' असें कै. मंडलिक म्हणतात.
लोकांच्या धर्मव्यवस्थेचे निबंधग्रंथ या भट्टांनी लिहिले म्हणून मोठया धर्मकृत्यांच्या प्रसंगी भट्ट घराण्यांतील पुरुषांस अध्यक्षस्थान देण्याचा रिवाज सर्वत्र आहे. या ग्रंथांत जुन्या स्मृती जमेस धरून व ठिकठिकाणचे आचार संकलित करून त्यांनी व्यवस्थित पद्धती बांधून दिल्या. एकाच घराण्यांत असे एकसारखे विद्वान पुरुष निपजल्याचीं उदाहरणें फारच थोडीं आढळतील. कमलाकर भट्टाचे वंशज कांतानाथभट्ट (मिर्झापूर येथील संस्कृत पाठशाळेचे अध्यापक) यांनी भट्टवंशकाव्य नांवाचा ग्रंथ लिहिलेला आहे.
[मराठी रियासत पूर्वार्ध, स. १९१५; विविधज्ञान विस्तार वर्ष ४५ अ. १२; भा. इ. मं. चतुर्थ संमेलनवृत्त.]